Menu Close

सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच पर्याय : श्री. मनोज खाडये

  • दापोली येथे हिंदु धर्मजागृती सभा

  • प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय या ग्रंथाचे सभेमध्ये प्रकाशन

dapoli_dipprajwlan

दापोली : निधर्मीवाद्यांच्या बेगडी सर्वधर्मसमभावाच्या पोपटपंचीचे गंभीर परिणाम म्हणून देशात आतंकवाद, धर्मांतर, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोहत्या, भ्रष्टाचार, अनाचार, महागाई या समस्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. या समस्यांचे निराकरण करण्याचा एकच पर्याय असून तो म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना हा होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले.

dapoli_upastiti

दापोली येथील आझाद मैदानात हिंदु जनजागृती समितीने १० एप्रिलला आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर आय्.ए.आय्.एस्.चे (इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटचे) महाराष्ट्र राज्य संघटक श्री. अभिजित देशमुख आणि सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर उपस्थित होते.

dapoli_sabhba

हिंदु धर्मजागृती सभेचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. सनातनचेे श्री. ज्ञानदेव पाटील यांनी हा शंखनाद केला. त्यानंतर आय्.ए.आय्.एस्.चे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. अभिजित देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. मनोज खाडये यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

इसिसला रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच कार्य करावे लागेल ! – श्री. अभिजित देशमुख

abhijit_deshamukh

मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगभरात आतंकवादाने हैदोस घातला आहे. इसिस या आतंकवादी संघटनेत आजवर लाखो धर्मांध युवकांनी प्रवेश केला आहे. जून २०१४ ला इसिसने जगाचा इस्लामिक नकाशा प्रसिद्ध करून संपूर्ण जगभर इस्लामिक स्टेट स्थापन करण्याचे घोषित केले. भारतातील युवक मोठ्या प्रमाणात इसिसकडे आकर्षित होत असतांना शासनाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची कोणतीही कृती होतांना दिसत नाही.

यामध्ये काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे फडकवले जाणे, जे.एन्.यू.मध्ये आतंकवादी अफझलचा उदोउदो करणे, असदुद्दीन ओवैसीचे भारतमाता की जय म्हणायला विरोध करणे, हे भारतात इसिसचे स्वागत करण्यासारखे आहे. भारतातील राष्ट्रप्रेमी युवक राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध झाले नाहीत, तर भारताचे खुरासान होण्यास वेळ लागणार नाही. इसिसला रोखण्यासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊनच कार्य करावे लागेल ! असे प्रतिपादन आय्.ए.आय्.एस्.चे (इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेटचे) महाराष्ट्र राज्य संघटक श्री. अभिजित देशमुख यांनी केले. या वेळी श्री. मनोज खाडये आणि श्री. दैवेश रेडकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *