Menu Close

नरकाची भीती धर्मांधांनाच !

आतंकवाद्यांचा ‘आदर्श’ असलेला आणि मलेशियात ‘लपून’ बसलेला डॉ. झाकीर नाईक याने पुन्हा हिंदुद्वेषी गरळओक करण्यास आरंभ केला आहे. ‘मूर्तीपूजा पाप असल्याने मुसलमानेतर नरकातच जातील’, असे वक्तव्य त्याने केले आहे. आता हे ‘मुसलमानेतर’ म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून हिंदू आहेत, हे वेगळे सांगायला नको. ‘जगात जेवढे काही मुसलमान आहेत, ते ‘जन्नत’मध्ये, तर हिंदू मात्र मूर्तीपूजक असल्यामुळे नरकात जाणार’, असे झाकीर नाईक याचे म्हणणे आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. त्यामुळे झाकीर नाईक हिंदूंना कितीही पाण्यात पहात असला, तरी असे काही होणार नाही. जग इस्लाममय करण्याच्या विचाराने पछाडलेला झाकीर नाईक याने ‘सर्वधर्मसमभाव’ वृत्ती असणार्‍या हिंदूंना आता लक्ष्य करण्यास आरंभ केला आहे. त्यामुळेच त्याच्या म्हणण्यानुसार केवळ मुसलमानांविषयी चांगली भावना बाळगणे पुरेसे नाही, तर अशांनी थेट त्यांचा स्वधर्म सोडून इस्लामची कास धरणे आवश्यक आहे. याचा दुसरा अर्थ असा होतो की, त्याची आतापर्यंत तळी उचलणारे निधर्मीवादी, पुरोगामी यांनी इस्लाम न स्वीकारल्यामुळे ही सर्व मंडळी नरकातच जाणार आहेत. यावरून धर्मांधांना कितीही कडेवर घेतले, तरीही ते त्यांचा रंग दाखवतात, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले. झाकीर याचा हिंदुद्वेष हा आताच प्रकट होत आहे, असे नाही. वर्ष २०१७ मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या काळात त्याने ‘श्री गणेश हा देव आहे, हे सिद्ध झाले, तरच मी त्याचा प्रसाद ग्रहण करीन’, असे वक्तव्य केले होते. हिंदूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली. त्यानंतर झाकीर, तसेच त्याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ची चौकशी झाली. पुढे अटकेच्या भीतीने तो विदेशात परागंदा झाला आणि विदेशात राहून त्याने हिंदुविरोधी गरळओक चालूच ठेवली.

‘अटकेच्या भीतीने बिळात लपून बसलेल्या एका आतंकवादीप्रेमी जिहाद्याचे वक्तव्य एवढे काय मनाला लावून घ्यायचे ?’, असेही काही जणांना वाटू शकते; मात्र हा विचार धर्माधिष्ठित नाही. हिंदुत्वावर कुणीही लहान किंवा मोठा, शक्तीशाली किंवा शक्तीहीन अशी कुणीही टीकाटिपणी केल्यास त्याच जोमाने आणि शक्तीनिशी त्याचा प्रतिवाद करणे, हे धर्मकर्तव्य असते; कारण धर्मावर प्रथम होणारा आघात हा वैचारिक असतो. या आघाताकडे कानाडोळा केल्यास पुढे सशस्त्र आघातांना सामोरे जावे लागते. हा इतिहास आहे. आताही झाकीर नाईक याने मूर्तीपूजेविषयी वक्तव्य केल्यावर धर्मप्रेमी किंवा हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशाने झाकीर याच्यासारख्या जिहाद्यांचे फावते आणि ते मोठ्या प्रमाणात टीका करू लागतात.

मूर्तीपूजनाचे महत्त्व !

केवळ इस्लामी कट्टरतावादीच नव्हे, तर धर्मांध ख्रिस्तीही हिंदूंना ‘सैतानाचे पूजक’ म्हणून हिणवतात. गेली कित्येक दशके हिंदूंच्या मनात ‘मूर्तीपूजा करणे रानटीपणाचे, संस्कृतीहीनतेचे लक्षण आहे’, असे वारंवार बिंबवले गेले. त्यामुळे हिंदूंच्या मनातही मूर्तीपूजेविषयी अढी निर्माण झाली. ‘आमचा ईश्‍वर हा निर्गुण निराकार आहे. तो चराचरात आहे. त्यामुळे आम्हाला मूर्तीपूजनाची आवश्यकता नाही’, असे हे मूर्तीभंजक कट्टरतावादी नेहमी सांगतांना दिसतात; मात्र हेच कट्टरतावादी मशिदीत किंवा चर्चमध्ये जातात, दर्ग्यासमोर डोके टेकतात किंवा येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेसमोर गुडघे टेकून बसतात. अशा वेळी निर्गुण, निराकार ईश्‍वराची संकल्पना ही मंडळी बासनात बांधून ठेवतात. याविषयी त्यांना जाब विचारायला हवा. ‘तुमचा ईश्‍वर निर्गुण आणि निराकार आहे, तर भोंग्यांवरून मोठमोठ्याने बांग का देता ?’, ‘कोरोना महामारीमुळे घरीच थांबा’, असा प्रशासन सल्ला देत असतांनाही तुम्ही मशिदीत का जमा होता ?’, अशा असंख्य प्रश्‍नांची उत्तरे झाकीर नाईक आणि त्याची टोळी यांनी द्यायला हवी.

ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या साधकाला प्राथमिक अवस्थेत निर्गुण निराकार ईश्‍वराची भक्ती करणे कठीण जाते. त्यामुळे ईश्‍वर ज्या सगुण रूपात प्रकटला, त्या रूपात त्याची आराधना करणे, भक्ती करणे सोपे जाते. पुढे भक्त ‘देवतेचे हे रूप चराचरात आहे’, याची अनुभूती घेतो आणि नंतर पुढच्या टप्प्यात गेल्यावर त्याला देवाला आळवण्यासाठी समोर मूर्तीची आवश्यकता लागत नाही. त्या वेळी तो खर्‍या अर्थाने ‘सगुण निर्गुण नाही भेदाभेद’ ही अवस्था अनुभवतो. हिंदु धर्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ सांगितले आहेत. इतका उदात्त विचार असणार्‍या हिंदु धर्माविषयी पाशवी कृत्ये करण्यास कुख्यात असणार्‍यांनी बोलणे हास्यास्पद ठरते.

मोक्षप्राप्ती महत्त्वाची !

नाईक आडनाव लावून मिरवणारे झाकीर हे स्वतः बाटगे आहेत. त्यांना हिंदु धर्म, हिंदूंच्या परंपरा, हिंदु संस्कृती यांविषयी पोटशूळ आहे, तर त्यांनी प्रथम स्वतःचे हिंदु आडनाव पालटावे. मागील १ सहस्र वर्षे मुसलमान आक्रमक भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र ते त्यांना जमले नाही. आता उरला सुरला प्रयत्न म्हणून झाकीर नाईक यांच्यासारखे धर्मांध हे हिंदूंना नरकाची भीती दाखवून त्यांचे धर्मांतर करू पहात आहेत. हिंदू याला भीक घालणार नाहीत. ‘मुसलमानेतरांचा वंशविच्छेद करणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांच्या स्त्रिया पळवून बलात्कार करणे’ अशा गोष्टी करून झाकीर आणि त्यांचे चाहते असणारे जिहादी आतंकवादी यांना ‘जन्नत’ मिळणार, असे आहे का ?

सात्त्विक आणि सदाचरणी लोकांना स्वर्गात, तर पाशवी कृत्ये करणार्‍यांना नरकात स्थान मिळते. हिंदु धर्मामध्ये जेवढा स्वर्ग आणि नरक यांचा अभ्यास केला आहे, तेवढा अन्य पंथियांमध्ये दिसत नाही. त्याही पुढे जाऊन स्वर्गात न अडकता पुढे मोक्षापर्यंत वाटचाल कशी करायची, याची शिकवण हिंदु धर्मात दिली आहे. त्यामुळे तलवारीच्या जोरावर जग इस्लाममय करून स्वतःला जन्नतमध्ये स्थान मिळण्याची स्वप्ने पहाणार्‍यांनी हिंदूंना नरकाची भीती दाखवू नये. येणार्‍या काळत झाकीर याची जागा कारागृहात असेल. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या भवितव्याची चिंता करणे इष्ट !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *