Menu Close

‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या पहिल्‍या दिवशीच्‍या दुसर्‍या सत्रातील मान्‍यवरांचे उद़्‍बोधक विचार !

भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी संघटित होऊन प्रयत्न करण्‍याचा हिंदुत्‍वनिष्‍ठ मान्‍यवरांचा निर्धार !

३० जुलै या दिवशी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्‍या ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या दुसर्‍या सत्रात ‘हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना’ या उद़्‍बोधन सत्रात माननीय वक्‍त्‍यांनी त्‍यांचे विचार मांडले. सर्वच मान्‍यवरांनी आजची परिस्‍थिती बिकट असून हिंदूसंघटनाशिवाय पर्याय नाही, अशा आशयाचे मत मांडले. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी हिंदूसंघटनासह धर्मानुसार आचरण करणेही आवश्‍यक आहे, हे मान्‍यवरांनी त्‍यांच्‍या भाषणांतून अधोरेखित केले.

चिरंतन सत्‍यावर आधारित असलेल्‍या ‘सनातन वैदिक हिंदु धर्मा’नुसार आचरण करणे आवश्‍यक ! – पू. डॉ. शिवणारायन सेन, अध्‍यक्ष, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल

पू. डॉ. शिवणारायन सेन, अध्‍यक्ष, शास्‍त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता, बंगाल

पृथ्‍वीवरील सर्व प्राणी आहार, निद्रा, भय, मैथुन या क्रिया करतात; मात्र धर्माचे आचरण केवळ मनुष्‍य प्राणीच करू शकतो. पूर्वी हिंदूंवर धर्माचा प्रभाव होता. त्‍यामुळे इतरांवर अन्‍याय करण्‍याची वृत्ती नव्‍हती. पुरुष एकपत्नी तर महिला पतिव्रता होत्‍या; मात्र आज जनता धर्मभ्रष्‍ट आणि धर्मद्रोही होऊ लागली आहे. पृथ्‍वीवर ७५ टक्‍के पाप आणि २५ टक्‍के पुण्‍य घडते आहे. त्‍यामुळे चिरंतन सत्‍यावर आधारित एकमेव अशा ‘सनातन वैदिक हिंदु’ धर्मानुसार आचरण करणे आवश्‍यक आहे, तरच संपूर्ण विश्‍वाचे कल्‍याण होईल.

सध्‍याच्‍या साम्‍यवादी नेपाळी राज्‍यकर्त्‍यांच्‍या विरोधात संघर्ष करून नेपाळमध्‍ये हिंदु राष्‍ट्राची पुनर्स्‍थापना करू ! – डॉ. मानव भट्टराई, अध्‍यक्ष, राष्‍ट्रीय धर्मसभा नेपाल, काठमांडू, नेपाळ

डॉ. मानव भट्टराई, अध्‍यक्ष, राष्‍ट्रीय धर्मसभा नेपाल, काठमांडू, नेपाळ

नेपाळ ‘हिंदु राष्‍ट्र’ होते; मात्र विदेशी प्रभाव आणि राजकारण यांमुळे ते ‘धर्मनिरपेक्ष’ राष्‍ट्र घोषित करण्‍यात आले. आजही ९० टक्‍के नेपाळी जनतेला ‘नेपाळ हे हिंदु राष्‍ट्र व्‍हावे’, असेच वाटते. विदेशी आणि धर्मविरोधी लोकांची हिंदु राष्‍ट्रावर कुदृष्‍टी आहे; म्‍हणून हिंदु राष्‍ट्राच्‍या विरोधात तेथे धनशक्‍तीचाही प्रयोग केला जात आहे. सध्‍याची राजसत्ता धर्म, संस्‍कृतीविरोधी आणि लोकांची दिशाभूल करणारी आहे. धर्मशास्‍त्राचे ज्ञान मिळवण्‍यासाठी विश्‍वातील लोक नेपाळला भेट देत होते. ‘वाल्‍मिकी रामायण’ हे नेपाळच्‍या पवित्र भूमीत लिहिले गेले. नेपाळ ‘हिंदु राष्‍ट्र’ झाले नाही, तर प्राचीन वारसा आणि गौरव पुन्‍हा प्राप्‍त करता येणार नाही. नेपाळमध्‍ये हिंदूंच्‍या हितासाठी कार्य करणार्‍या अनेक संघटना आहेत; मात्र त्‍यांच्‍यामध्‍ये समन्‍वय, संघटितपणा नाही. असे असले, तरी मला विश्‍वास आहे की, येत्‍या काळात नेपाळची मठ, मंदिरे, प्राचीन धर्मशाळा, गोशाळा यांना गतवैभव प्राप्‍त होईल. आम्‍ही पर्यावरणपूजक आहोत. येथे नदी, डोंगर, वन यांचे पूजन केले जाते. नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र झाल्‍याने पदोपदी अडचणी येत आहेत. तरी त्‍यांच्‍यावर मात करून भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्‍ट्र घोषित करण्‍यासाठी शेवटच्‍या श्‍वासापर्यंत प्रयत्न करू.

ज्‍याप्रमाणे जेवणाला मिठाशिवाय चव नाही, त्‍याप्रमाणे जीवनाला धर्माशिवाय अर्थ नाही ! – श्री. धर्मयेशा जी, इंडोनेशिया

श्री. धर्मयेशा जी, इंडोनेशिया

‘धर्म’ या संकल्‍पनेकडे केवळ स्‍वार्थासाठी नव्‍हे, तर जीवनावश्‍यक घटक म्‍हणून पहाणे आवश्‍यक आहे. ‘धर्म म्‍हणजे मोक्षप्राप्‍तीचे साधन’, ही खरी धारणा आहे. ज्‍याप्रमाणे जेवणाला मिठाशिवाय चव नाही, त्‍याप्रमाणे जीवनाला धर्माशिवाय अर्थ नाही.  स्‍वतःला ‘धर्मरक्षक’ म्‍हटले तर अहंकार वाढतो आणि ‘धर्मसेवक’ म्‍हटले तर अहंकार अल्‍प होतो. ‘धर्मो रक्षति रक्षितः ।’ या उक्‍तीप्रमाणे जो धर्माचे रक्षण करेल त्‍याचे धर्म म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो; म्‍हणून हिंदूंनी संघटितपणे, एक परिवार बनून धर्माची सेवा करावी. शाळांमधून रामायण, महाभारत, पंचतंत्र, हितोपदेश अशा प्रकारचे ग्रंथ शिकवले गेले, तर विद्यार्थ्‍यांवर आपोआप संस्‍कार होतील.

‘हिंदुविरोधा’च्‍या विषाणूवर ‘हिंदु राष्‍ट्र’ हाच उपाय ! – प्रमोद मुतालिक, संस्‍थापक अध्‍यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

 

प्रमोद मुतालिक, संस्‍थापक अध्‍यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

देशात सातत्‍याने लव्‍ह जिहाद, भ्रष्‍टाचार आणि आतंकवादी कारवाया घडत आहेत. हिंदूसंघटन, तसेच हिंदूंमध्‍ये जागृती करणे, हे ईश्‍वरी कार्य आहे. जात, पात, पक्ष, संघटना बाजूला ठेवून केवळ ‘हिंदू’  म्‍हणून संघटित होणे आवश्‍यक आहे. हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात देशाच्‍या प्रत्‍येक नागरिकाने योगदान द्यायला हवे. आज जगभरात कोरोनाच्‍या विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूप्रमाणे ‘हिंदूविरोध’ विषाणू रोखणे आवश्‍यक आहे. या विषाणूवर ‘हिंदु राष्‍ट्र’ हाच उपाय आहे.

हिंदू संघटनांच्‍या एकत्रीकरणाचे आव्‍हानात्‍मक कार्य करत हिंदु जनजागृती समितीने हिंदूशक्‍ती निर्माण केली !

– प्रमोद मुतालिक, संस्‍थापक अध्‍यक्ष, श्रीराम सेना, कर्नाटक

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *