Menu Close

‘वैचारिक’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवून नक्षलवादाच्या रोगाला रोखा ! – ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘अर्बन नक्षलवाद आणि अपरिचित डॉ. दाभोलकर’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्र

पुणे : कोरोनाचे विषाणू शरिरात जाऊन आपल्याच शरिरातील आपल्याच पेशींना कोरोना विषाणूमध्ये परिवर्तित करतात आणि स्वत:ची संख्या वाढवतात. स्वत:लाच शत्रू करून टाकणारा हा कोरोना विषाणू आणि नक्षलवाद, माओवाद अन् जिहाद यांमध्ये असेच साम्य आहे. या सर्व देशविघातक प्रवृत्ती आपल्या बुद्धीमध्ये वैचारिक बाधा आणतात. नक्षलवादाच्या या विषाणूला रोखण्यासाठी राष्ट्र-धर्मासाठी लढणार्‍यांनी संघटित होऊन आपली ‘वैचारिक’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला हवी, असे प्रतिपादन ज्येेष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांनी केले. ‘शहरांमध्ये नक्षलवाद कशा प्रकारे पसरत आहे ?’, ‘त्याचे स्वरूप काय आहे ?’, ‘त्याला छुप्या पद्धतीने खतपाणी घालणारे हस्तक कोण आहेत ?’ अशा अनेक प्रश्‍नांवर प्रकाश टाकण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अर्बन नक्षलवाद आणि अपरिचित डॉ. दाभोलकर’ या विषयावर २० ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ सामाजिक माध्यमांतून विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर बोलत होते. या कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. या संवादाचे सूत्रसंचालन सनातनचे श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

या संवादात बोलतांना श्री. चेतन राजहंस यांनी अंनिसच्या विरोधात अनेक पुराव्यांविषयी माहिती देत अंनिसचा खोटारडेपणा आणि डॉ. दाभोलकरांच्या नक्षलवादाशी असलेल्या संबंधाविषयीची साशंकता स्पष्ट केली. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी दाभोलकर हत्याप्रकरणी न्यायालयात केलेले युक्तीवाद, अन्वेषणातील त्रुटी आणि विसंगती स्पष्ट करत चुकीच्या दिशेने होत असलेल्या अन्वेषणाची सत्यता समोर आणली.

श्री. भाऊ तोरसेकर पुढे म्हणाले,

१. गिरीष कर्नाड, वरवरा राव, गौरी लंकेश हे सर्व नक्षलवादाची वैचारिक बाधा झालेले रोगी आहेत.

२. कोणत्याही परिस्थितीत संघटित होऊन या समस्येला सोडवायला हवे. त्याच्या उपायांची चर्चा व्हायला हवी.

३. जसे कोरोना हा दुबळ्या, वृद्ध व्यक्तींना सहजपणे मारू शकतो, तसेच ही ‘वैचारिक’ बाधा दुबळ्या घटकांना म्हणजे आदिवासी, कष्टकरी, दुर्दशेत जगणारे यांना आधी कह्यात घेते. इथेच ही बाधा रोखायला हवी.

४. आंबेडकरी चळवळीच्या ऊर्जेचा उपयोग अगदी सहजतेने नक्षली चळवळीसाठी केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माओवादविरोधी होते. त्यांचे तत्त्वज्ञान माओवादावरच आधारित असल्याचे भासवण्यात येत आहे.

५. जिहादी, नक्षलवादी आणि ख्रिस्ती हे हिंदु धर्मावर आघात करत आहेत. त्यांना ठाऊक आहे की, जोपर्यंत हिंदु समाज अस्तित्वात आहे तोपर्यंतच भारत हा खंडप्राय देश राहू शकतो.

धर्माला अफूची गोळी मानणारे हे केवळ धर्मविरोधी नव्हे, तर राष्ट्रविरोधी ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

‘धर्म म्हणजे अफूची गोळी आहे’, असे मानणार्‍यांचे हे वैयक्तिक मत असते. त्यामुळे धर्म न मानणार्‍या चळवळींपासून दूर रहा. त्या केवळ धर्मविरोधी नाहीत, तर राष्ट्रविरोधी आहेत. भारतात असलेले माओवादी पक्ष, ‘सेक्युलर’ पक्ष आणि जिहादी शक्ती या शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍या ३ समर्थक शक्ती आहेत. त्या केवळ हिंदुविरोधी नसून देशविरोधी आहेत. आतापर्यंत अंनिसवर पुराव्यांसह अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. अंनिस ही नक्षलवादाला साहाय्य, आर्थिक भ्रष्टाचार, विदेशी राष्ट्रद्रोही संस्थांकडून अनुदान, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पांच्या नावाखाली अवैधपणे कार्य करणे अशा कार्यांमध्ये गुंतलेली संघटना असल्याचे वारंवार दिसून आले आहे. ईश्‍वरभक्तीचा मार्ग दाखवणार्‍या संतांनी दांभिकतेला, अंधश्रद्धेला आळा घातला. आताचे पुरोगामी मात्र सश्रद्ध नसतांना, निरिश्‍वरवादी असतांना दांभिकतेविषयी बोलतात हे अयोग्य आहे. केवळ श्रद्धेनेच ज्ञान आणि मोक्षप्राप्ती होते.

वैचारिक आतंकवादाची दांभिकता ओळखा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘केवळ बॉम्बस्फोट घडवून आणि बंदुकीच्या जोरावर आपले अस्तित्व टिकू शकत नाही’, हे लक्षात आल्यावर नक्षलवाद शहरांकडे वैचारिक माध्यमांतून शिरला. नक्षलवादी समर्थक डॉ. विनायक सेन यांना अटक झाल्यानंतर त्यांना जामीन मिळावा, यासाठी २२ नोबेल पुरस्कार विजेत्यांनी सरकारला पत्रे लिहिली. अवैध कृत्ये प्रतिबंध कायदा लावण्यात आलेल्या डॉ. विनायक सेन यांना कोणत्याही कारणाशिवाय जामीन दिला गेला. केवळ साम्यवादामुळे झालेल्या हिंसेतून १४ सहस्रांहून अधिक बळी गेले ते महत्त्वाचे नाहीत का ? १४ सहस्र जणांना ज्यांनी मारले त्यांना आधी शिक्षा करा, त्यानंतर तथाकथित ४ पुरोगाम्यांच्या हत्यांविषयी बोला, असे आवाहन का केले जात नाही ? वर्ष २०१० मध्येच सतीश शेट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या झाली. या प्रकरणाचे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे असलेले अन्वेषण मात्र बंद करण्यात आले. माहिती अधिकार कार्यकर्ता मोठा नाही का ? ही वाढत असलेली वैचारिक दांभिकता ओळखता यायला हवी. आमची सरकारकडे मागणी आहे की, अंनिस, श्रमिक नागरी पतसंस्था यांसारख्या संस्थांमध्ये आर्थिक ताळेबंदाचा असलेला गैरकारभार आणि नक्षलवाद यांचा संबंध आहे का, याची चौकशी व्हायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातच दाभोलकर हत्याप्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक झाली. त्यांच्याविषयीचे अन्वेषण पुढे जायला हवे.

या संवादाचे ‘फेसबूक, यू ट्यूब आणि ट्विटर’च्या माध्यमांतून थेट प्रक्षेपण करण्यात आले. फेसबूकच्या माध्यमातून १ लाख १८ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत हा विषय पोचला. यू ट्यूबवर ४ सहस्रांहून अधिक लोकांनी हे थेट प्रक्षेपण पाहिले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *