Menu Close

आयुर्वेदाची जोड दिल्याने नगर येथे १ सहस्र ४०० रुग्ण कोरोनामुक्त

यावरून पुन्हा एकदा आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करणेही महत्त्वाचे आहे. शासकीय स्तरावर या उपचारपद्धतींवर संशोधन करून लोकांचे जीव वाचवण्याची ही वेळ आहे !

नगर – आयुर्वेद व्यासपीठ, महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आणि प्रभा आयुर्वेद फाऊंडेशन या आयुर्वेद पदवीधारकांच्या संघटनांच्या वतीने नगर येथील ‘बूथ’ रुग्णालयामधील कोरोनाबाधित रुग्णांवर १८ जूनपासून आयुर्वेदीय औषधोपचार चालू करण्यात आले. त्यामुळे १ सहस्र ४०० रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत, अशी माहिती डॉ. महेश मुळे यांनी दिली.

१. विशेष म्हणजे शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळाले नसतांना नगरमधील वैद्यांनी उपचारांत सातत्य राखून महाराष्ट्रात सर्वाधिक चांगली कामगिरी केली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत, कोरोना संसर्गाचा धोका पत्करून, नि:स्वार्थी भावनेने आणि सेवाभावी वृत्तीने वरील संघटनांचे वैद्य स्वतः रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करत आहेत.

२. कोरोनाबाधित रुग्णांना उत्तम दर्जाची प्रत्येकी १५ दिवसांची औषधे विनामूल्य दिली जातात. संघटनांचे डॉक्टर आणि समाजातील दानशूर व्यक्ती या सर्व औषधांचा खर्च करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.

३. रुग्णांमधील ताप, कोरडा खोकला, सर्दी, घसा दुखणे, श्‍वास घेण्यास त्रास, अंगदुखी, वास न येणे, चव न कळणे, भूक न लागणे, नैराश्य, प्रचंड भीतीमुळे झोप न लागणे आदी लक्षणे आयुर्वेदीय औषधे चालू झाल्यानंतर न्यून होऊ लागल्याचे अनेक रुग्णांनी सांगितले. या रुग्णांची १५ दिवसांनी आणि १ मासाने दूरभाषद्वारे विचारपूस केली असता नंतरही काहीच त्रास झाला नसल्याचे रुग्णांनी सांगितले.

४. औषधांसह रुग्णांचे नियमितपणे तज्ञ वैद्यांकडून समुपदेशन केले जाते. त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी त्यांच्या विचारात सकारात्मकता आणण्यासाठी उत्तम वाचन, ध्यान योगासने, योग्य व्यायामाची माहिती दिली जाते. शारीरिक तसेच मानसिक आरोग्य आणि प्रतिकारशक्ती उत्तम राहावी, यासाठी आयुर्वेदातील अग्नी आहार-विहार, दिनचर्या ऋतुचर्या पंचकर्म उपचार, रसायन चिकित्सा यांची माहिती दिली जाते.

५. कोरोनासारख्या महामारीला सक्षमपणे सामोरे जायचे असेल, तर प्राचीन भारतीय वैद्यक आयुर्वेद आपण जीवनशैली म्हणून स्वीकारायला हवे, असे येथील वैद्यांनी सांगितले. या सामाजिक उपक्रमात डॉ. महेश मुळे, डॉ. मंदार भणगे, डॉ. अंशू मुळे, डॉ. विश्‍वनाथ काळे आदी सहभागी झाले आहेत.

कोरोना महामारीवर गुळवेल ठरणार मैलाचा दगड !

केंद्रशासनाच्या आयुष ‘टास्क फोर्स’ने गुळवेल हे औषध एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घेण्याचे आवाहन केले होते. आपली रोगप्रतिकारक शक्ती अग्नीवर अवलंबून असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. ज्याचा अग्नी मंद होतो, तो या आजाराला बळी पडतो. हे सर्व प्रकारचे अग्नी उत्तम ठेवण्याचे काम गुळवेल करते; म्हणूनच कोरोनावर गुळवेल हे उत्तम औषध असल्याचे नगर शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदीय तज्ञ डॉ. (सौ.) अंशू महेश मुळे यांनी सांगितले.

कोरोनाबाधित रुग्णांवर आयुर्वेदीय औषध गुडुची घनवटीवर केलेल्या ‘क्लिनिकल’ चाचणीने हे आयुर्वेदीय औषध अल्प कालावधीत ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन’ या औषधापेक्षा परिणामकारक ठरले असल्याचा दावा राजस्थानच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् आयुर्वेद विद्यापिठाने केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *