Menu Close

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी केलेल्या अपकृत्याविरोधात भारताने घेतलेली कचखाऊ भूमिका

१. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील बुद्धांच्या मूर्तीचा विध्वंस विलंबाने केल्याप्रकरणी प्रायश्‍चित्त म्हणून १०० गायींची कत्तल करणे

‘तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील १ सहस्र ६०० वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या विशालकाय बुद्धमूर्तींचा विध्वंस करून मातीत विलीन केल्या. त्यानंतर निर्लज्ज तालिबान्यांनी एक पाऊल पुढे जाऊन म्हटले की, ‘अफगाणिस्तानच्या भूमीवरून बामियानामधून (बुद्ध) मूर्ती हालवण्यास त्यांनी केलेल्या त्या विलंबाविषयी प्रायश्‍चित्त घेणे अपरिहार्य आहे. इस्लाममध्ये प्रायश्‍चित्ताला ‘कफारा’ म्हणतात. या प्रायश्‍चित्ताचा मार्ग त्यांनी असा चोखाळला की, जेणेकरून हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळले जाईल. त्यांना इतर कोणी पशू मिळाला नाही आणि त्यांनी गायींना त्यांच्या क्रोधाचे लक्ष्य बनवले. प्रायश्‍चित्त म्हणून त्यांनी १०० गायींची हत्या (कत्तल) केली. असभ्य असंस्कृत जग मूर्तीसमोर बळी देते; पण तालिबानमध्ये तर बुद्धमूर्ती उशिरा तोडल्याकारणाने १०० गायींची कत्तल करण्यात आली. काबूलमधील मुल्ला उमरच्या निवासस्थानावर १२ गायींची हत्या झाली, तर उरलेल्या गायींची त्यांच्या ताब्यात असलेल्या निरनिराळ्या ठिकाणी कत्तल करण्यात आली. मुल्ला उमरने फतवा काढला की, बळी दिलेल्या गायींचे मांस अफगाणिस्तानच्या घराघरांत पोचले पाहिजे. अफगाणिस्तानातूून मूर्तीमाहात्म्य नष्ट करण्यास झालेल्या विलंबाविषयी मुल्ला उमरने दुःख प्रकट केले. जग काहीही म्हणो, आता तालिबान्यांना अफगाणिस्तानात एकही मूर्ती नको आहे.

२. भारताने दूरदर्शीपणाच्या अभावामुळे तालिबान्यांच्या विरोधातील संधी गमावणे

२ अ. तालिबान्यांच्या अपकृत्याविरोधात भारताकडून कठोर पावले उचलली न जाणे

तालिबान जर एकही संधी गमवायला सिद्ध नाही, तर भारतसुद्धा या दिशेने विचार का करत नाही ? बामियानामधील बुद्धमूर्तींच्या विध्वसांच्या अपमानाचे सूत्र बनवून भारताला कठोर पावले उचलता आली नसती का ? तत्कालीन भारत सरकारने केवळ शाब्दिक आतिषबाजी केली; पण या कपट-कारस्थानाविरुद्ध भरीव कारवाई करू शकले नाही. या संबंधाने भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची विशेष बैठक आमंत्रित करू शकत नव्हता का ?

२ आ. कंदाहार विमान अपहरण प्रकरणाच्या अपमानाचा सूड घेण्याची योग्य संधी भारताने गमावणे

भारताला वरील सूत्रावर सुरक्षा परिषदेची बैठक सहज बोलावता आली असती. अमेरिका, रशिया आणि इतर पश्‍चिमी राष्ट्र अशा प्रकारच्या बैठकीची वाट पहातच होते. भगवान बुद्धाच्या मूर्तीभंजनाचा प्रश्‍न असल्याने चीनसुद्धा विरोध करण्याचे साहस करू शकला नसता. पूर्व आशियातील बुद्धधर्मी देशांनी नक्कीच भारताला साथ दिली असती. सौदी अरब, पाकिस्तान आणि अरब देश यांनी तालिबानला मान्यता दिली आहे. तालिबानच्या या अपकृत्याचे समर्थन या तिघांनीही केलेले नाही. थोडक्यात हे एक असे सूत्र होते, ज्यावर अधिकांश जग तालिबानला धडा शिकवू इच्छित होते. भारताने सुरक्षा परिषदेवर दबाव आणला असता, तर त्याच्या नेतृत्वात समस्त देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संयुक्त राष्ट्राची सेना अफगाणिस्तानमध्ये पोचली असती.

रशिया आणि अमेरिका यांना हे पुष्कळ आधीच कळले होते की, जगातून आतंकवाद संपवायचा असल्यास सर्वप्रथम तालिबानला नष्ट करावे लागेल. चीनमधील मुस्लिमबहुल भागात आतंकवादाचा रोग पसरत असल्याने चीनलासुद्धा या तालिबानची भीती वाटतेच. जगातील सगळ्याच देशांना ही परिस्थिती एक वरदान होती. काश्मीरमध्ये तालिबानी आणि जिहादी यांच्या कारवायांमुळे किती त्रास होत आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. इतकी चांगली संधी शोधूनसुद्धा सापडली नसती. या आतंकवादी नागाचा फणा तुडवण्याची वाट संयुक्त राष्ट्र अनेक वर्षांपासून पहात होता आणि म्हणूनच भारताने या संदर्भात काही रस घेतला असता, तर या आतंकवाद्यांचे हात छाटण्यास त्रास झाला नसता. संयुक्त राष्ट्रांची जमेची बाजू म्हणजे त्याने अफगाणिस्तानात असलेल्या तत्कालीन रब्बानी सरकारलाच मान्यता दिली. रब्बानी सरकारच्या निमंत्रणावरून संयुक्त राष्ट्राची सेना बामियान परिसरात प्रविष्ट झाली असती आणि काही घंट्यांतच आतंकवाद्यांच्या नाटकाचा शेवट झाला असता. कंदाहार विमान अपहरणप्रसंगी भारत जे करू शकला नाही, ते त्याला या वेळी सहज करता आले असते. आपल्या अपमानाचा सूड घेण्याची योग्य संधी भारताने गमावली. हे आमच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अदूरदर्शीतेचे प्रमाण नाही का ?

३. मुसलमानांकडून धर्मनिष्ठा शिका !

तालिबानमधील बुद्धमूर्तींच्या विध्वंसाची घोषणा होताच सार्‍या जगाने एका सूरात आक्रोश केला की, सांस्कृतिक ठेव्यांविषयी अशी क्रूर चेष्टा करू नका. ‘युनेस्को’ने तालिबानला आग्रह केला की, या ठेव्यास अफगाणिस्तानाबाहेर हालवण्याची अनुज्ञा त्याने द्यावी. काही देशांनी, तर तालिबानला हवे, ते मूल्य देण्याची सिद्धता दर्शवली. एवढेच नव्हे, तर या मूर्ती अफगाणिस्तानाबाहेर नेण्याचा व्यय (खर्च) करण्याची सिद्धताही त्यांनी दाखवली; पण तालिबानने स्वतःचा आसुरी निर्णय पालटला नाही. ‘इस्लामी आदेशाचा सौदा डॉलरमध्ये होऊ शकत नाही’, हे त्यांनी ठणकावून सांगितले. मुल्ला उमरच्या एका साथीदाराने सांगितले, ‘आम्ही या मूर्तींचा विध्वंस करताच अल्लाने पाऊस पाडला. अमेरिका आणि फ्रान्स आम्हाला पाणी देऊ शकत होते ?’ असाही प्रश्‍न त्याने विचारला.

इराणमध्ये नववर्ष मोठ्या धामधुमीने साजरे केले जाते. त्याला तेथे ‘नवरोज’ असे म्हणतात. भारतात ज्याप्रमाणे होळी साजरी केली जाते, तसेच नवरोज इराणमध्ये साजरे होते. इराणी माणसे एकमेकांना रंग लावतात, घरांना रंगीबेरंगी चित्रांनी सजवतात. नूतन वर्षप्रसंगी इराणी पुरुष आणि महिला पारंपरिक वेशभूषा करून नाचतात, गातात. नाचगाण्यांचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषाने आयोजित केला जातो; पण तालिबानांना इराणी लोकांचाही आनंद पहावला गेला नाही. त्यांच्या मुल्लाने म्हटले, ‘‘हा उत्सव (सण) तर हिंदूंचा आहे. मुसलमान जनता नववर्षदिनी हे काही करत नाहीत.’’ उलट ते म्हणतात, ‘सगळेच दिवस अल्लाने बनवले असल्याने ते सारखेच केले आहेत. त्या दिवसांत डावे-उजवे करणारे आम्ही कोण ?’ या कारणावरून पाकिस्तानमध्ये ‘डेरा इस्माइलखानात’ जेव्हा इराणी लोक नववर्ष साजरे करत होते, तेथे जाऊन तालिबानींनी गोळ्या घातल्या आणि दगडफेकही केली. परिणामी २ ठार, तर १२८ जण घायाळ झाले. जेथे जेथे इराण आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा एकमेकांना भिडतात, तेथे तेथे अशाच प्रकारचे दंगे झाले. थोडक्यात तालिबान्यांना जेथे हिंदुस्थानी चिन्हे दिसतात, तेेथे त्यांचे संहारक तांडव चालू होते.

४. कट्टर देश नसलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा जन्म

अफगाणिस्तानचा इतिहास सांगतो की, तो देश कधी कट्टर नव्हता. खिलाफत चळवळीनंतर जेव्हा टर्कीमध्ये केमाल पाशाचे अधिपत्य होते, तेव्हा अफगाणिस्तानात अमानुल्ला खानने इस्लामी कट्टरतेविरुद्ध एक जबरदस्त चळवळ उभी केली होती. तिची घोषणा होती,

कपडों में सजा इस्लाम नहीं, दाढी में छुपा इस्लाम नहीं, टोेपी में छुपा इस्लाम नहीं ।
ऐ मर्दे मुजाहिद पार चलो दरयाए अटक के पार चलो, कंधार चलो, कंधार चलो ।

दुःखाची गोष्ट ही की, कालच्या त्या अफगाणिस्तानमध्ये आज तालिबानने जन्म घेतला.’

– मुझफ्फर हुसेन

(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, एप्रिल २००१)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *