Menu Close

इस्लामी आतंकवादावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून उत्तर देणे आवश्यक : फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन

मोझाम्बिक येथील इस्लामिक स्टेटच्या आक्रमणाचे प्रकरण

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना जे वाटते, ते इस्लामी देशांना का वाटत नाही ? तसेच भारतालाही ते का वाटत नाही आणि भारत यासाठी पुढाकार का घेत नाही ? भारत गेली ३ दशके इस्लामी आतंकवादाने पीडित असतांना भारताने मौन रहाणे अपेक्षित नाही !

पॅरिस (फ्रान्स) : मोझाम्बिकमध्ये ५० हून अधिक लोकांचा शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. महिलांचे अपहरण करण्यात आले. गावांना लुटण्यात आले. घरांना आगी लावण्यात आल्या. जंगली लोकांनी एका शांतीवाल्या धर्माचे अपहरण करून त्यात आतंकवादाचे बीज रोवले आहे. इस्लामी आतंकवाद एक आंतरराष्ट्रीय संकट आहे आणि याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरून उत्तर देण्याची आवश्यकता आहे, असे ट्वीट फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केले आहे. फ्रान्सने काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेत असलेल्या माली देशातील अल्-कायदाच्या आतंकवाद्यांवर एअर स्ट्राइक करून ५० हून अधिक जणांना ठार केले होते.

मोझाम्बिकमधील आक्रमण इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांकडून करण्यात आले. आक्रमण करतांना ते ‘अल्ला हू अकबर’च्या घोेषणा देत होते. अपहरण करण्यात आलेल्या महिलांवर बलात्कार करून त्यांना शारीरिक संबंधांसाठी गुलाम बनवून ठेवण्यात आले आहे. सीरियामध्ये पराभूत झालेले इस्लामिक स्टेटचे आतंकवादी पूर्वी आफ्रिकी देश मोझाम्बिकच्या ‘मोसिमबोआ दा प्रेइया’ नावाच्या शहराला नवी राजधानी घोषित करून तेथे तळ निर्माण करून रहात आहेत. येथे असलेले घनदाट जंगल आणि हिंद महासागराशी सहज येत असलेला संपर्क यांमुळे या देशाला ‘आतंकवाद्यांचा स्वर्ग’ मानले जाते.

मोझाम्बिकमध्ये इस्लामिक स्टेटने आतापर्यंत केलेला हिंसाचार !

१. वर्ष २०१७ पासून आतापर्यंत १५०० हून अधिक लोकांची हत्या

२. इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या भयाने लक्षावधी लोकांनी आपले घर सोडून देशात इतरत्र पलायन केले आहे.

३. देशात मोठ्या प्रमाणात महिलांचे अपहरण करून त्यांना ‘वेश्या नि दासी’ म्हणून ठेवण्यात आले आहे.

४. देशातील कच्च्या तेलाच्या विहिरींवर त्यांनी नियंत्रण मिळवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *