Menu Close

‘सीएए-एनआरसीच्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांचा सहभाग

‘सी.ए.ए.-एन.आर.सी.’ आंदोलनाप्रमाणे शेतकरी आंदोलनातून देश अस्थिर करण्याचा देशविरोधी शक्तींचा डाव ! – कपिल मिश्र, माजी आमदार, दिल्ली

पूर्वीच्या सरकारच्या काळात थेट आतंकवादी आक्रमणे करून वा बाँबस्फोट घडवून देशात अस्थिरता माजवता येत होती. आता तसे थेट करता येत नसल्यामुळे देशविरोधी शक्तींनी सी.ए.ए. (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) यांच्या वेळी शाहिनबागसारखी आंदोलने केली आणि नंतर हिंसक दंगली घडवल्या. आता तोच प्रकार शेतकरी आंदोलनाला माध्यम बनवून चालू आहे. दिल्लीनंतर देशभरातील अन्य राज्यांत अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. या मागे खलिस्तानी संघटना आणि अन्य देशविरोधी शक्ती कार्यरत आहेत; पण त्यांनी हे लक्षात घ्यावे की ज्याप्रमाणे दिल्लीतील दंगलीनंतर सर्व दोषींवर कारवाईचे सत्र चालू झाले. तसे शेतकरी आंदोलनाच्या वेळी कोणी देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न केला, तर सरकारद्वारे कठोर कारवाई होऊ शकते, असे वक्तव्य भाजपचे नवी दिल्ली येथील नेते तथा माजी आमदार श्री. कपिल मिश्र यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्र की…’ कार्यक्रमांतर्गत ‘सी.ए.ए.-एन्.आर्.सी.च्या वर्षपूर्तीचे राष्ट्रीय अवलोकन’ या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमांतून 46,166 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 1,46,204 लोकांपर्यंत कार्यक्रम पोहोचला.

या वेळी बोलतांना प्रसिद्ध लेखिका आणि ‘मानुषी’ मासिकाच्या संपादक प्रा. मधु पौर्णिमा किश्‍वर म्हणाल्या की, ‘सी.ए.ए.’ कायदा आणण्यापूर्वी सरकारने विदेशातील हिंदूंवर होणार्‍या भीषण अत्याचारांविषयी श्‍वेतपत्रिका काढायला हवी होती. चित्रपट आदी माध्यमांतूनही त्या विषयी मोठी जनजागृती करायला हवी होती; मात्र पुरेशी पूर्वसिद्धता न केल्यामुळे माहिती तंत्रज्ञानात पुढे असलेल्या देशविरोधकांनी त्याला मुस्लिमविरोधी निर्णय म्हणून प्रसिद्ध करून जगभरात मानहानी केली. एका मुस्लिमावर एक ओरखडा उठला, तरी त्याचा आंतरराष्ट्रीय मुद्दा केला जातो. तसे आपण हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी जागृती करत नाही.

या वेळी बोलतांना पाकमधून भारतात आलेल्या पीडित हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी लढणारे ‘निमित्तेकम्’चे अध्यक्ष श्री. जय आहुजा म्हणाले की, ‘सी.ए.ए.’ मुळे हजारो शरणार्थी हिंदूंना नागरिकत्व मिळणार आहे. आपण सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हिंदुत्वाचा आवाज राष्ट्रीय स्तरावर बुलंद केला पाहिजे. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, ‘सी.ए.ए.’, ‘एन्.आर्.सी.’द्वारे सरकार हिंदू राष्ट्राच्या दिशेने जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यातून हिंदु राष्ट्र म्हणजे काही तरी भयंकर असल्याचा प्रचार केला जात आहे; मात्र हे कायदे करण्याला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामवर आधारित देशच कारणीभूत आहेत. तेथील अल्पसंख्याकांवर होणार्‍या हल्ल्यांचे वास्तव जगभरात ज्ञात आहे. अशा वेळी हिंदु सिद्धान्तांवर आधारित आदर्श हिंदू राष्ट्रच न्याय देणारे ठरू शकते. त्यामुळे हिंदु राष्ट्र अत्यंत आवश्यक आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *