Menu Close

हिंदूंना गतवैभव मिळावे !

‘हिंदूबहुल भारतात हिंदूंना कोण वाली आहे ?’, असा प्रश्‍न हिंदूंना विचारल्यास त्याचे उत्तर देणेही कठीण आहे; कारण भारत जरी हिंदूबहुल असला, तरी आज तो पुरातन वास्तू किंवा मंदिरे यांच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या धर्मांधांच्याच कह्यात आहे. विदिशा (मध्यप्रदेश) येथील एका उदाहरणावरूनच याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. तेथील उदयपूरनगरमध्ये १ सहस्र वर्षे प्राचीन असलेल्या परमार वंशाच्या राजमहालावर धर्मांधांचे नियंत्रण होते. महंमद काझी सय्यद इरफान अली नावाच्या धर्मांधाने या राजमहालात मदरसा चालू केला आणि हा राजमहाल १ सहस्र नव्हे, तर ४०० वर्षे प्राचीन असून त्याचे बांधकाम पूर्वजांनी केल्याची बतावणीही केली. राजमहालाच्या ठिकाणी ‘ही माझी खासगी संपत्ती आहे’, असा फलकही लावला. याविषयीची माहिती काही जागरूक हिंदूंनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यावर तहसीलदारांनी आदेश देऊन कारवाई करवून घेतली. आता हा राजमहाल प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. प्राचीन स्थापत्यकला, शिल्पकला आणि वास्तूकला यांचा प्रत्यय अजूनही या राजमहालाच्या वास्तूतून येत असल्याचे हिंदूंचे म्हणणे आहे. हिंदु धर्माचे अस्तित्व दर्शवणार्‍या अशा वास्तूच्या ठिकाणी स्वतःच्या मालकीचा फलक लावण्याचे धर्मांधांचे धाडस होते तरी कसे ? विशेष म्हणजे शासन-प्रशासनाला याचा थांगपत्ताही लागत नाही, हे खेदजनक आहे. हिंदूंच्या अशा किती पुरातन मंदिरांमध्ये किंवा वास्तूंमध्ये धर्मांधांनी मदरसे स्थापन करून इस्लाम धर्म फोफावण्यास प्रारंभ केला असेल, हे सांगता येणेही अवघड आहे. ही स्थिती पहाता हिंदूंनी हातावर हात ठेवून बसणे परवडणारे नाही; कारण हे असेच चालू राहिले, तर एक दिवस ‘हिंदु’ या शब्दावरही धर्मांधांचेच नियंत्रण येईल. हिंदूंनो, ही वेळ येऊ देऊ नका ! त्यासाठी वेळीच सावध व्हा ! ‘कोणतीही सचेतन पुरातन वास्तू फार काळ टिकत नाही’, असे म्हटले जाते; परंतु आजवरचा भारतीय इतिहास पाहिला, तर हिंदु संस्कृतीशी संबंधित असलेल्या अनेक वास्तू आणि मंदिरे आजही तितक्यात प्रमाणात टिकून आहेत. केवळ टिकून नव्हे, तर त्या वास्तूंमधील जिवंतपणाची प्रचीतीही अनेकांना येते. हे नक्कीच अद्भुत आहे.

धर्मांधांचे षड्यंत्र !

वर्षानुवर्षांपासून हिंदु संस्कृतीची पाळेमुळे धर्मांधांनी उखडून टाकून त्यावर आपलेच वर्चस्व प्रस्थापित करण्याचा निर्दयी प्रयत्न चालवलेला आहे. दुर्दैवाने हिंदूही त्याला बळी पडतात. धर्मांधांना भारताचे इस्लामी देशात रूपांतर करायचे आहे. हाच त्यांचा आतापर्यंतच्या सर्व आक्रमणांमागील कुटील हेतू आहे. भारतातील जनता इस्लामी झाली की, संपूर्ण भारत आपोआप नष्ट होईल, हा त्यांचा मनसुबा धर्मनिष्ठ हिंदूंनी उधळून लावायला हवा. भारतात राहूनही देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात सहभागी न होता हिंदु धर्मावर कुरघोडी करून स्वतःला पृथक करून घेण्यातच ते धन्यता मानतात. खरेतर मुसलमान आक्रमकांनी भारतात येण्यापूर्वी भारत हे एक समर्थ हिंदु राष्ट्र म्हणून गौरवले जायचे; मात्र मुसलमानांच्या आक्रमणांनंतर या इतिहासाच्या पाऊलखुणाच पुसल्या गेल्या, ही देशाची शोकांतिका आहे. या पाऊलखुणा पुन्हा निर्माण करून भारताच्या हिंदु राष्ट्राच्या इतिहासाचा पुनर्गौरव व्हायला हवा. त्यासाठी धर्मांधांनी हिसकावून घेतलेला आपला वैभवशाली हिंदु वारसा आपल्याला पुन्हा लढून मिळवायला हवा. तसे झाल्यासच मावळलेल्या भारताच्या राष्ट्रचंद्राचा पुन्हा एकदा राष्ट्रोदय होईल, हे निश्‍चित ! यासाठी हिंदूंनाच झटावे लागणार आहे. ‘ही माझी मातृभूमी आहे. हे माझे राष्ट्र आहे’, असा आवाज अंतरातून आल्यासच हिंदूंमध्ये ‘हिंदुत्व’, ‘राष्ट्रीयत्व’ जागवण्याची प्रेरणा निर्माण होऊ शकते.

सहस्रावधी वर्षांपासून आजपर्यंत हिंदूंवर अनेक परकीय आक्रमणे झाली. अन्याय, तसेच अत्याचार सहन केले. यामुळे हिंदू व्यथित झाले खरे; पण ते या अन्यायाविरोधात वेळीच पेटून उठले नाहीत. त्यांनी देशभावना आणि धर्मभावना यांना प्राधान्यही दिले नाही. असे ‘हिंदुत्व’ परकीय आक्रमकांनी हिरावून घेतले. त्यामुळे राष्ट्राची स्थिती शोचनीय झाली. असे असले, तरी या हिंदुत्वाचे प्रखर तेज नष्ट झालेले नाही, हे आक्रमणकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. हिंदू तेव्हा पेटून न उठल्याने त्यांचे वैभव धर्मांधांच्या नियंत्रणात गेले. असे असले, तरी भावी हिंदु राष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगलेला आजचा हिंदु हा धर्मनिष्ठ आणि सतर्कही झालेला आहे. हिंदूंच्या गतस्मृती पुन्हा एकदा जागवण्यासाठी वेळप्रसंगी तो संघटितही होत आहे.

हिंदूंचा ऐतिहासिक लढा !

धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा म्हणजे खरेतर हिंदूंचेच वैभव आहे; पण या भोजशाळेवर डोळा ठेवून धर्मांधांनी त्यांचेच वर्चस्व तेथे प्रस्थापित केले. खरेतर प्रत्येक वसंतपंचमीच्या निमित्ताने तेथे सरस्वतीदेवीच्या पूजेचे आयोजन केले जाते; मात्र धर्मांधांनी त्यात आडकाठी आणत नमाजपठण आरंभले आणि हिंदूंना तेथे येण्यास बंदी घातली. काही वर्षांपूर्वी हा संघर्ष फारच टोकाला गेला. संघटित हिंदूंच्या प्रयत्नांनंतर या लढ्याला काही प्रमाणात यश मिळाले आणि पूजा करण्याची अनुमती पुरातत्व विभागाने हिंदूंना दिली; मात्र अजूनही ही भोजशाळा हिंदूंच्या नियंत्रणात आलेली नाही. भोजशाळा जोपर्यंत पूर्णपणे हिंदूंची होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायला हवा. एरंडोल (जळगाव) येथील पांडववाडा हेही हिंदूंचे ऐतिहासिक वैभव आहे; मात्र या पांडववाड्यावर धर्मांधांनी अनधिकृतपणे नियंत्रण मिळवले आणि तेथे नमाज पढू लागले. तेथील मुख्य गर्भगृहात हिंदूंना प्रवेश दिला जात नाही. धर्मांधांच्या तावडीतून पांडववाडा मुक्त व्हावा, यासाठी हिंदूंनी अनेक वर्षे संघर्ष केला. विदिशा, धार आणि एरंडोल यांप्रमाणे अशा अनेक वास्तू धर्मांधांच्या तावडीतून सोडवायला हव्यात. ‘धर्मांधांच्या कह्यातील हिंदूंच्या सर्वच वास्तू आणि मंदिरे यांची मुक्ती होऊ दे. त्यांची पुनर्स्थापना लवकरात लवकर होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळू दे आणि भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होऊ दे, अशी धर्मनिष्ठ हिंदूंची आर्त प्रार्थना !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *