Menu Close

येणार्‍या भीषण आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधनाच करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाच्या ‘प्रोफाईल मेंबर्स’साठी ‘ऑनलाईन धर्मशिक्षणवर्ग वर्षपूर्ती सोहळ्या’चे आयोजन !

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

पुणे – कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार, डॉक्टर आणि रुग्णालये यांनी केलेली लूट या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले. दळणवळण बंदीमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, व्यवसाय बंद झाले, तसेच अनेकांचे प्राण गेले. त्यानंतर लगेचच ‘तौक्ते’ आणि ‘यास’ अशा दोन वादळांमुळे जनजीवन आणखी विस्कळीत झाले. ही स्थिती असतांना धर्मांध वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद करत आहेत. मागील वर्षी ‘कोरोना जिहाद’मुळे कोरोना महामारी देशात पसरली. मागील मासातच मध्यप्रदेशमध्ये एक धर्मांध परिचारिका हिंदूंना इंजेक्शनमध्ये लस न भरताच सुई टोचत होती. हा ‘लस जिहाद’ आहे, असे म्हटल्यास चुकीचे ते काय ? दुसरीकडे अमेरिकेतील ख्रिश्‍चन संस्था हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी भारतात पाठवत आहेत. भारताला ख्रिश्‍चन राष्ट्र बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. हे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. ‘येणारा काळ हा अजून कठीण असणार आहे’, असे अनेक संत, द्रष्टे यांनी सांगितलेले आहेच. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केवळ भगवंतच आपल्याला साहाय्य करू शकतो आणि यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या दळणवळण बंदीच्या काळात हिंदु जनजागृती समितीच्या प्रोफाईल मेंबर्ससाठी ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. या वर्गास एक वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या सोहळ्यामध्ये १०३ हून अधिक प्रोफाईल मेंबर्स सहभागी झाले होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रोफाईल मेंबर श्री. मिलिंद कालगांवकर यांनी केले, तर सोहळ्याचा उद्देश प्रोफाईल मेंबर श्री. अमित खेडकर यांनी सांगितला. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले.

हिंदूंच्या समस्या दूर करण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची आवश्यकता ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

१. आज मंदिर सरकारीकरणामुळे मंदिरांच्या भूमी हडप करण्यात आल्या आहेत. याला कारणीभूत असलेला वर्ष १९५१ मधील ‘मंदिर अधिग्रहण कायदा’, तसेच वर्ष १९९१ मधील ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हे कायदे रहित झाले पाहिजेत. या आणि देशातील हिंदूंच्या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करायला हवे. अनेक साधू-संतही यासाठी प्रयत्न करत आहेत. नुकतेच हरिद्वार येथे ‘शंकराचार्य परिषदे’चे अध्यक्ष प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी देशभरातील साधू, संत, महंत, आखाडे, मठ, धर्मगुरु, तसेच सर्व शंकराचार्य यांना एकत्र करून ‘या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे’, या मागणीसाठी महाअभियान चालू केले आहे.

२. धर्मनिरपेक्ष भारतात पंजाबचे मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुसलमानबहुल भागाला वेगळा जिल्हा घोषित केले आहे. या देशात मोगलाई चालू झाली आहे का ?

३. भारतातून अफगाणिस्तानमध्ये इसिस या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी झालेल्या महिलांना पुन्हा भारतात रहाण्यास अनुमती देण्याची मागणी काँग्रेस करत आहे. या महिला ‘टुरिस्ट’ म्हणून नव्हे, तर ‘टेररिस्ट’ (आतंकवादी) म्हणून तिकडे गेल्या होत्या. त्यांना आतंकवादी कृत्ये करायला परत देशात घ्यायचे का ?

४. आज भारतामध्ये ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमात हिंदुद्वेष दिसून येत आहे. ‘हिंदु नाव असलेला ‘हरि’ नावाचा मुलगा मुलींची छेड काढतो, तर ‘अब्दुल’ नावाचा मुलगा सर्वांना साहाय्य करतो,’ असे या पुस्तकात लिहिले आहे. ‘१२ वर्षांचा ‘शिरीषकुमार’ याने छातीवर गोळ्या झेलल्या; पण तिरंगा खाली पडू दिला नाही’, असा देशप्रेम असलेल्या क्रांतीकारकांचा इतिहास न शिकवता, ज्या मोगलांनी या देशावर आक्रमणे केली, त्यांचा उदोउदो ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ त्यांच्या पुस्तकातून करत आहे. या शिक्षणपद्धतीला कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने २० वर्षे मुसलमान व्यक्तींनाच शिक्षणमंत्री केले होते. त्यामुळे खरा इतिहास विद्यार्थ्यांसमोर येण्यासाठी शिक्षणपद्धतीत पालट होणे आवश्यक आहे.

धर्मशिक्षणवर्गास नियमित उपस्थित असणार्‍या प्रोफाईल मेंबर्सनी व्यक्त केलेले मनोगत

१. श्री. विनायक रोडगे – धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून सण, उत्सव, व्रते यांमधील शास्त्र, देवघरातील देवतांची मांडणी, देवपूजा, नामस्मरणाचे महत्त्व, आदर्श दिनचर्या, स्वभावदोष निर्मूलन यांसारखे अनेक विषय समजले. मी धर्माचरण करण्यास आरंभ केला आहे.

२. श्री. दौलत माने – मागील वर्षभरापासून मी धर्मशिक्षणवर्गाला नियमित जोडतो. धर्मशिक्षणवर्गामध्ये नामजप कोणता करावा ? हे समजले. नामजप चालू केल्यापासून मला पुष्कळ चांगले वाटत आहे. पूर्वी मला बर्‍याच अडचणी येत होत्या. आता नामजपामुळे त्या न्यून झाल्या आहेत. तसेच मी आधी मांसाहार करत होतो. वर्गामध्ये यायला लागल्यापासून माझी मांसाहार करण्याची इच्छा आपोआपच न्यून होत गेली.

३. श्री. शुभम जाधव – पूर्वी माझा पुष्कळ वेळ व्यर्थ जात होता. धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून वेळेचे योग्य नियोजन कसे करावे ? हे समजले. त्यानंतर मला वेळेचा सदुपयोग करता यायला लागला. धर्मशिक्षणवर्गात नामजपाचे महत्त्व समजले. प्रतिदिन नामस्मरण करण्यास आरंभ केल्यामुळेच कोरोनाच्या काळात मी सुरक्षित राहिलो.

४. श्री. कुणाल गवारी – पूर्वी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार यायचे. समितीच्या धर्मशिक्षणवर्गात आल्यापासून मला अनेक विषय समजले. समितीचे कार्य पाहून माझ्या मनात सकारात्मक विचार निर्माण झाले. या कार्यात सहभागी होतांना पुष्कळ आनंद मिळत आहे.

५. श्री. उद्धव तोडकर – हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यापासून नित्यपणे स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि धर्मशिक्षणवर्ग यांमध्ये सहभागी होत आहे. तेव्हापासून मला पुष्कळ आनंद आणि समाधान मिळत आहे.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *