Menu Close

रझा अकादमीच्या झुंडशाहीला अमरावतीत हिंदूंचे मोर्च्याद्वारे प्रत्युत्तर !

  • शहरात जमावबंदी लागू

  • प्रक्षुब्ध जमावाकडून दुकानांची तोडफोड

  • पोलसांचा लाठीमार  

  • २० जणांना अटक 

धर्मांधांच्या मोर्च्यात सहिष्णुता बाळगणारे पोलीस त्यांचा प्रतिकार करणार्‍या जमावावर मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

अमरावती – त्रिपुरा राज्यात काही मशिदी पाडल्याच्या कथित घटनांच्या निषेधार्थ १५ – २० सहस्र धर्मांधांनी १२ नोव्हेंबर या दिवशी अमरावती शहरातून मोर्चा काढला होता. या मोर्च्यामागे रझा अकादमीचा हात असल्याचे समोर येत आहे. धर्मांधांनी काढलेल्या मोर्च्याच्या वेळी त्यांनी २० – २२ दुकानांची तोडफोड करून दुकानदारांना मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने शहरात १३ नोव्हेंबर या दिवशी ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. या वेळी काढण्यात आलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागले. जमावाने दुकानांवर दगडफेक करत त्यांची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणार्‍यांवर लाठीमार केला. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. अमरावती शहरात झालेल्या दोन्ही दिवसांच्या घटनांच्या प्रकरणी पोलिसांनी २० तक्रारी प्रविष्ट केल्या असून आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. शहरात ‘बंद’च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौकाचौकांत राज्य राखीव पोलीस दलाचे सैनिकही तैनात करण्यात आले होते. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावती येथे आले असून त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. अमरावती येथे १३ नोव्हेंबर या दिवशी दुपारी २ वाजल्यापासून संचारबंदी लागू आहे.

या घटनेला कुणीही राजकीय वळण देऊ नये ! – यशोमती ठाकूर, पालकमंत्री

राज्याच्या महिला अन् बालकल्याणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, ‘‘कुणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. त्याला कुणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये.’’

समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर कारवाई करू ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘राज्य सरकार परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आहे, तसेच मी स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अमरावती वगळता संपूर्ण राज्यात शांतता आहे. समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर, तसेच चिथावणी देणार्‍यांवर कारवाई केली जाईल.’’

रझा अकादमीवर बंदी घाला अन्यथा आम्ही तिला संपवू ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांची सरकारला चेतावणी

महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये १२ नोव्हेंबर या दिवशी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ‘रझा अकादमी’ ही हिंदुद्वेषी धर्मांध संघटना प्रत्येक वेळी शांतता भंग करते. सर्व नियम पायदळी तुडवते. तरीही सरकार बघत बसते. सरकारने ‘रझा अकादमी’वर बंदी घालावी अन्यथा महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही तिला संपवू, अशी चेतावणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे दिली. १२ नोव्हेंबरला भिवंडी आणि नांदेड येथे रझा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केली असल्याचा आरोप आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *