Menu Close

राजापूर (रत्नागिरी) येथील ‘दांडे-अणसुरे’ पुलाची दुरुस्ती तातडीने करा ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’ मोहिमेच्या अंतर्गत पत्रकार परिषद आणि प्रशासनाला निवेदन सादर

  • सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न !

डावीकडून सनातन संस्थेचे श्री. भास्कर खडपे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी आणि श्री. विनोद गादीकर

रत्नागिरी – काही वर्षांपूर्वी महाड येथे येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू झाला होता. सावित्री नदीवरील पुलाप्रमाणे जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गाजवळ असलेला ‘दांडे-अणसुरे’ पूलही वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. दांडे-अणसुरे पुलाला जोडलेला रस्ता अनुमाने ४ वर्षांपूर्वीच खचलेला आहे. रस्ता आणि पूल यांना जोडणार्‍या खांबालाही भेगा पडल्या आहेत. पुलाचे ‘जॉईंट’  (जोडणारे भाग) काही ठिकाणी निखळले असून त्यांमधील स्टीलही गंजलेले आहे. या पुलावर दिव्यांची व्यवस्था नाही. पुलाच्या धोकादायक स्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाने या पुलावरील एस्.टी. गाड्यांची वाहतूक बंद केली; मात्र सद्य:स्थितीत खासगी बसवाहतूक सर्रास चालू आहे. वास्तविक हा पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करायला हवा. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या चौकशीअंती महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या समितीने जो अहवाल सादर केला, त्यामधील सूचना या राजापूर येथील पुलासाठीही लागू होतात. त्यामुळे सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर ‘दांडे-अणसुरे’ पुलाची तातडीने दुरुस्ती करावी आणि तोपर्यंत नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’चे श्री. संजय जोशी यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेपूर्वी या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांच्याकडे देण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. जोशी यांनी या वेळी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे श्री. भास्कर खडपे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर हे उपस्थित होते.

रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुशांत खांडेकर यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांशी दूरभाषद्वारे संपर्क साधून पुलाविषयी पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *