Menu Close

केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर आणि सहलेखक श्री. चिरायू पंडित लिखित ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ पुस्तकाचे गोव्यात लोकार्पण

‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ पुस्तकाचे लोकार्पण करतांना डावीकडून सर्वश्री चेतन राजहंस, उदय माहुरकर आणि रमेश शिंदे

ताळगाव (पणजी)  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर नव्याने प्रकाश टाकणारे आणि केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर अन् सहलेखक श्री. चिरायू पंडित लिखित ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन ९ जानेवारी या दिवशी येथील ‘गोमंतक मराठा समाज  राजाराम स्मृति सभागृहा’त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि पुस्तकाचे लेखक श्री. उदय माहूरकर उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष मुंबई येथील श्री. प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलीस महासंचालक) हेही या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन’ स्वरूपात उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आचरणात आणले असते, तर फाळणी नाहीच; उलट भारत विश्‍वगुरु बनला असता ! – उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त

गोव्यात झालेल्या ‘इन्क्विझिशन’चा उल्लेख इतिहासात केलेला नाही. देहली येथे आजही अनेक रस्त्यांना क्रूर मोगलांची नावे दिलेली आहेत. ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इयत्ता ७ वीच्या एका पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख केवळ एकदाच आलेला आहे. आज अल्पसंख्यांकांच्या शासकीय अनुदानित शाळांत मौलवी नेमल्यास त्यांचे वेतन शासन देते; मात्र हिंदू बहुसंख्य असूनही एखाद्या शासकीय अनुदानित शाळेत पंडित नेमायचे असल्यास शासन अनुमती देत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे आणि ‘राष्ट्रीय सुरक्षे’चे एक ‘आयकॉन’ (प्रतिनिधी) होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार आचरण केले असते, तर फाळणी तर नाहीच; उलट भारत विश्‍वगुरु बनला असता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे पालन न केल्याने देशाची मोठी हानी झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माफीपत्रे लिहिल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. माफीपत्रे ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे मुख्य ध्येय साध्य करण्यासाठी आचरणात आणलेली चाणक्यनीती आहे. ‘हिंदवी’ स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या कार्यकाळात काळानुरूप ५ वेळा माफीपत्रे लिहिली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन नव्याने अभ्यासण्यासाठी सर्वांनी ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे वाचन करावे आणि त्यांचे विचार आचरणात आणावेत.

‘वीर सावरकर  दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील मान्यवरांचे विचार आणि क्षणचित्रे असा झाला कार्यक्रम…

शंखनाद आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांच्या हस्ते अनुक्रमे व्यासपिठावर ठेवण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या समयोचित मार्गदर्शनांनंतर संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शैलेश बेहरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले. या कार्यक्रमाचे हिंदु जनजागृती समितीच्या ट्विटर आणि ‘यू ट्यूब’ खात्यांवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण सहस्रो लोकांनी पाहिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आजच्या काळातही अनुकरणीय ! – प्रवीण दीक्षित, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक (निवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र)

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे आजच्या काळातही अनुकरणीय आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक बहुआयामी व्यक्तीमत्त्व होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा अभ्यास करू लागल्यास ती व्यक्ती कधी ‘सावरकरमय’ होते, हे तिला कळतच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांतून स्फूर्ती घेऊन अनेकांनी मोठे कार्य झाले आहे. ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे सर्वांनी वाचन करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आचरणात आणावे.

‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वप्न सिद्ध करण्याचे दायित्व आता हिंदूंचे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

श्री. चेतन राजहंस

स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे नेते होते. ७० वर्षे उलटूनही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार ही देशासाठी वैचारिक संपत्ती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, ‘भारतियांना स्वाभिमानाने जीवन जगायचे असल्यास भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाले पाहिजे. हे आज शक्य नाही झाले, तरी नंतर ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होईल. हे दायित्व मी माझ्या पुढील पिढीकडे सुपुर्द करतो.’ यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याचे दायित्व आता आपल्यावर आले आहे. ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे वाचन केल्याने हिंदूंना नवीन विचार आणि ऊर्जा प्राप्त होईल आणि ते ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्याच्या कार्यात सहभागी होऊ शकतील.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित पुस्तकामुळे समाजाला प्रेरणा मिळेल ! – धर्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज, पिठाधीश, श्रीक्षेत्र तपोभूमी

धर्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी कार्यक्रमासाठी पाठवलेला लेखी संदेश

केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर आणि सहलेखक श्री. चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रिवेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाच्या वाचनामुळे अनेकांना राष्ट्र आणि धर्म कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. हिंदु जनजागृती समितीने या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करून हा विषय सर्वांसमोर आणला आहे. आज राष्ट्रभक्तीचे धडे पाठ्यपुस्तकांतून नाहीसे झाले आहेत. समाजात देश आणि धर्म यांना प्राधान्य दिले जात नाही, हे भयावह आहे. श्रीक्षेत्र तपोभूमी देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी कार्यरत आहे. आज आपण देशभक्तीची ही ज्योत प्रज्वलित ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन श्रीक्षेत्र तपोभूमी येथील धर्मभूषण प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी कार्यक्रमस्थळी लेखी संदेश पाठवून केला.

मी ‘हिंदूसंघटक’ आहे, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाक्य हिंदूंनी विसरू नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे

‘एकवेळ माझी ‘मार्सेलिस’ची उडी विसरलात, तरी चालेल; पण मी ‘हिंदूसंघटक’ आहे, हे विसरू नका’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले आहे. हेच विचार स्वीकारून आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्राचे कार्य पुढे न्यायचे आहे. ‘चरख्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले’ असे म्हटले जाते, तर मग देश स्वतंत्र होऊन अनेक वर्षांनी म्हणजे वर्ष १९६१ मध्ये गोवा, दमण आणि दीव या भागाला स्वातंत्र्य का मिळाले ? अखंड भारताच्या निर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याच्या कार्यात सर्वांनी सहभाग घेऊया. स्वातंत्र्यवीर सावरकर आज हयात नसले, तरी त्यांचे विचार आपल्याकडे आहेत. या विचारांच्या आधारे यापुढे देशाचे होणारे विभाजन आपण रोखू शकतो.

सनातन संस्थेचे कार्य समाजात चांगले संस्कार निर्माण करते !  उदय माहूरकर, केंद्रीय माहिती आयुक्त, भारत सरकार

सनातन संस्थेशी माझे गेल्या २० वर्षांपासून चांगले संबंध आहेत. मी बडोदा (गुजरात) येथे असतांना सनातन संस्थेचे येऊन साधक मला भेटायचे. त्यांनी माझ्या मुलांवर पुष्कळ चांगले संस्कार केले आहेत. सनातन संस्था समाजात चांगले संस्कार निर्माण करणारी संस्था आहे, असे गौरवोद्गार श्री. उदय माहूरकर यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी काढले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *