Menu Close

देशाच्या फाळणीचा पुन्हा प्रयत्न केला, तर यापूर्वी गेलेला भागही कह्यात घेऊ ! – कपिल मिश्रा

हिंदु सेवा परिषदेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५९ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रम !

दीपप्रज्वलन करतांना १. श्री. कपिल मिश्रा, २. महामंडलेश्वर स्वामी मुकुंददासजी महाराज, ३. हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया आणि अन्य मान्यवर

जबलपूर (मध्यप्रदेश) : भारतात हिंदू बहुसंख्यांक असून ते धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी करत आहेत. विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे. येथे अल्पसंख्यांक नाही, तर बहुसंख्यांक आपल्या धर्मरक्षणासाठी धर्मांतरविरोधी कायद्याची मागणी करत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या खिलाफत चळवळीत १० सहस्र हिंदूंचा नरसंहार झाला; पण हिंदूंचे दुर्दैव आहे की, या चळवळीतील जिहाद्यांना गेल्या वर्षीपर्यंत स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्तीवेतन दिले गेले. जिहादला स्वातंत्र्यसंग्राम बनवले गेले. देहलीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाच्या भिंतीवर ‘खिलाफत २.०’ लिहिले गेले. याचा अर्थ काय ?

पुन्हा खिलाफत चळवळ करून तुम्हाला देशाची फाळणी करायची आहे का ? या देशात पुन्हा फाळणीचा प्रयत्न केला, तर याद राखा ! त्या वेळी हिंदु जनजागृती समिती, हिंदु सेवा परिषद यांसारख्या संस्था नव्हत्या. आजसारखे तेजस्वी युवक नव्हते. आता पुन्हा देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला, तर यापूर्वी दिलेला भागही या देशातील तेजस्वी युवक परत घेतील, असे प्रतिपादन ‘हिंदु इकोसिस्टम’चे संस्थापक आणि माजी आमदार श्री. कपिल मिश्रा यांनी केले. ते येथील शहीद स्मारक गोलबाजार येथे हिंदु सेवा परिषदेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या १५९ व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमाला संबोधित करत होते. या कार्यक्रमाचा लाभ ५०० युवकांनी घेतला. या वेळी व्यासपिठावर महामंडलेश्वर स्वामी मुकुंददासजी महाराज, आर्य समाजाचे आचार्य धीरेंद्र, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, हिंदु सेवा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी, हिंदु सेवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. सौरभ जैन, प्रदेश महासचिव श्री. धर्मेंद्र ठाकूर अन् सूत्रसंचालक श्री. योगेंद्र त्रिपाठी उपस्थित होते.

हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍याचे पालकत्व हिंदूंनी घ्यावे ! – कपिल मिश्रा

आज लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करण्याची चर्चा होते. हिंदूंना भविष्यात स्वतःची लोकसंख्या अल्प होऊ नये म्हणून अधिक अपत्ये जन्माला घालण्याच्या सूचना दिल्या जातात; पण पोटची १-२ मुले असली, तरी ती आपल्या रक्षणासाठी समर्थ आहेत का ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. प्रत्येक हिंदूने हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या १० जणांचे जरी पालकत्व घेतले, तर येणार्‍या काळात ते आपले आणि आपल्या कुटुंबाचे निश्चित रक्षण करतील. त्यामुळे येणार्‍या भीषण काळात स्वतःच्या रक्षणासाठी तरी हिंदूंनी हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या १० मुलांचे पालकत्व घ्यायला हवे.

स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित तेजस्वी युवक बनण्याचा संकल्प करूया ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

१. स्वामी विवेकानंद कोट नव्हे, तर भगवे वस्त्र घालून विदेशात धर्मसंसदेला गेले; पण त्यांनी तेथे जी सनातन धर्माची मूल्ये सर्वांसमोर ठेवली, त्याचे भरभरून स्वागत झाले. आज आपण कोट घालून पश्चिमी परंपरेची नक्कल करतो; पण स्वामी विवेकानंद यांच्यासारखा तेजस्वी युवक बनण्याचा संकल्प का करत नाही ? स्वामी विवेकानंद यांनी त्या वेळी १०० तेजस्वी आणि ऊर्जावान युवकांची अपेक्षा केली होती. आज त्यांच्या जयंतीला आपण त्यांना अपेक्षित असा धर्माचरणी, राष्ट्रभक्त, निर्व्यसनी, बाहुबलाची उपासना करणारा तेजस्वी युवक बनण्याचा संकल्प करायला हवा.

२. केशकर्तनकार जावेद हबीब याने हिंदु महिलेच्या केसांमध्ये थुंकून तिचा अनादर केला. त्यानंतर प्रकरण अंगलट येत आहे, हे पाहून वांझोटी क्षमायाचना केली. प्रकरण अंगलट आल्यावर क्षमा मागण्याची, ही धर्मांधांची पद्धत आपण ओळखली पाहिजे.

३. याच जावेद हबीब यांनी त्याच्या दुकानाच्या विज्ञापनासाठी देवतांना त्याच्या ‘पार्लर’मध्ये बसलेले दाखवले. तेव्हाही त्याने क्षमा मागितली होती. त्याची मानसिकता पुन्हा उघड झाली आहे.

४. अशा प्रकारे थुंकण्याच्या जिहादी मानसिकतेला आळा घालण्यासाठी त्याच्या अटकेपर्यंत शांत बसता कामा नये.

श्री. कपिल मिश्रा यांनी हिंदु जनजागृती समितीविषयी काढलेले गौरवोद्गार !

आज पूर्ण देशात हिंदूंच्या मागे सक्षमपणे उभी राहिलेली हिंदु जनजागृती समिती ही एकमात्र संघटना आहे. ही संघटना समर्पित लोकांची आहे. जी प्रशिक्षण आणि कायदा यांच्या माध्यमातून हिंदूंना साहाय्य करत आहे.

संत आणि अन्य मान्यवर यांनी केलेले उद्बोधन

१. महामंडलेश्वर स्वामी मुकुंददास, पिठाधिश्वर, गुप्तेश्वर पीठ : हिंदु आज जागृत झाला आहे; पण त्याला उठून कार्य करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा तो उठून चालायला लागेल, तेव्हा त्याला आपली गती किती आहे ? अजून किती गती वाढवायला हवी, हे लक्षात येऊ शकते.

२. श्री. अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद : प्रत्येक संघर्षाच्या परिस्थितीत संघटन हिंदूंच्या समवेत आहे. प्रत्येक हिंदूने धर्मकार्यासाठी एकत्र व्हायला हवे.

३. श्री. सौरभ जैन, जिल्हाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद : आताच्या कठीण परिस्थितीत स्वरक्षणासाठी प्रत्येक हिंदूने सज्ज व्हायला हवे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *