Menu Close

गड-दुर्ग संवर्धनासाठी समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – रणजितसिंह निंबाळकर, खासदार, भाजप

‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’च्या वतीने विशाळगड पहाणी दौरा

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून होणारे दुर्लक्ष गंभीर आणि संतापजनक ! – संपादक  दैनिक सनातन प्रभात

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. महेश जाधव, अधिवक्त्या वर्षा डहाळे, श्री. सुनील देवधर, खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि श्री. नितीन शिंदे

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर पावनखिंडीत झालेली लढाई आणि त्यात धारातीर्थ पडलेल्या बाजीप्रभु-फुलाजी देशपांडे आणि बांदल सेनेच्या शूर वीरांचे स्मरण झाल्याविना रहात नाही. येणार्‍या काही दिवसांत राज्यातील सर्व गड-दुर्गांसह समुद्रातील शिवस्मारकास लवकरच भेट देऊन तेथील सुशोभीकरण, डागडुजी, स्वच्छता यांसाठी ‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’च्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन समितीचे अध्यक्ष भाजपचे खासदार श्री. रणजिसिंह निंबाळकर यांनी दिली.

‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’च्या वतीने २४ फेब्रुवारी या दिवशी विशाळगड पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. हा दौरा झाल्यानंतर विशाळगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सदस्य श्री. सुनील देवधर, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, अधिवक्त्या वर्षा डहाळे, समितीचे निमंत्रक श्री. जयकुमार शिंदे, भाजपचे श्री. महेश जाधव, कोल्हापूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस श्री. अशोक देसाई, मलकापूरचे नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू प्रभावळकर उपस्थित होते.  समितीचे निमंत्रक श्री. जयकुमार शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.

गड-दुर्गांवरील अतिक्रमण थांबवून पावित्र्य जपले पाहिजे ! – नितीन शिंदे, माजी आमदार

प्रतापगडावर एक इस्लामी आक्रमक सरदार अफझलखान याचे जसे उदात्तीकरण करण्याचा प्रकार झाला, त्याचप्रकारे विशाळगडावरही सरदार रेहान मलीकचे दर्ग्याच्या माध्यमातून उदात्तीकरण चालू आहे. विशाळगडावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले असून कोंबड्या-बकरी यांचे बळी देणे, मद्यपान हे सर्व थांबले पाहिजे. दर्ग्याच्या परिसराच्या विकासासाठी २० लाख रुपये दिले जातात आणि स्वराज्यासाठी बलीदान केलेल्यांच्या समाध्यांसाठी १ रुपयाही खर्च केला जात नाही, हे दुर्दैवी आहे. तरी गड-दुर्गांवरील अतिक्रमण थांबवून पावित्र्य जपले पाहिजे यासाठी प्रयत्नरत राहू.

या वेळी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने ‘महाराष्ट्र गडकिल्ले संवर्धन समिती’ला विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरांची दुरवस्था, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने दिलेला लढा, अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाची वेळकाढू वृत्ती याची सविस्तर माहिती दिली. या वेळी श्री. बाबासाहेब भोपळे, श्री. प्रसाद कुलकर्णी, धर्मप्रेमी श्री. हर्षल पोतदार, श्री. महेश विभूते आणि श्री. चेतन गुजर, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज काटकर उपस्थित होते.

श्री. सुनील देवधर म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभागाला जाब विचारणार आहोत. यापुढील काळात गडकोटांच्या अतिक्रमणासाठी व्यापक जागृती, दौरे करणार आहोत. चीनच्या सीमेवर भारतीय सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा केला आहे. इतके असामान्य महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे.’’

पत्रकार परिषदेत माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘ विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने हा विषय लावून धरल्याविषयी समितीचे कौतुक करायला हवे. कृती समितीने ज्या ज्या मागण्या केल्या त्या अत्यंत योग्य आहेत.’’

विशेष

१. पत्रकार परिषदेत हिंदूंना आवाहन करतांना श्री. सुनील देवधर म्हणाले, ‘‘विशाळगडावरील हिंदूंच्या मंदिरांचा परिसर हा स्वच्छ आणि मन प्रसन्न करणारा आहे, तर दर्गा परिसर हा प्लास्टिक यांसह अन्य कचरा, तसेच गलिच्छ वातावरण असलेला आहे.’’

२. विशाळगडाची पहाणी करून झाल्यावर ‘विशाळगड अतिक्रमणमुक्त झालाच पाहिजे’, ‘गडजिहाद बंद करा’, ‘गडावरील अतिक्रमण निघालेच पाहिजे’, अशा जोरदार घोषणांनी विशाळगड दणाणून गेला.

३. ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’मुळे हा विषय समजण्यास साहाय्य झाले, असे श्री. सुनील देवधर यांनी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *