Menu Close

राष्ट्र-धर्माच्या कार्याला साधना आणि आध्यात्मिक उपाय यांची जोड द्या ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

नियमित साधना करून आदर्श हिंदु राष्ट्र संघटक बनण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

मुंबई, ठाणे, रायगड येथील धर्मप्रेमींसाठी ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ कार्यशाळा !

उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना सद्गुरु डावीकडे (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर आणि त्यांच्या बाजूला हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनीष माळी

ठाणे – समाजात वाढत्या रज-तमामुळे ज्या प्रमाणात नकारात्मकता आहे, त्या प्रमाणात भाव-भक्ती नाही. पूर्वी ऋषिमुनींना त्रास भोगावे लागले होते. आताही प्रत्येक मनुष्याला जीवनात पूर्वजांचे त्रास, वास्तूदोष, अनिष्ट शक्तींचे त्रास यांसारख्या विविध आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. या आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपायच करावे लागत. सनातन संस्थेने केलेल्या आध्यात्मिक संशोधनाच्या माध्यमातून सर्वांसाठी मार्गदर्शक असलेले आध्यात्मिक उपाय हे एका संजीवनीप्रमाणे आहेत. वैयक्तीक जीवनासमवेत राष्ट्र-धर्माचे कार्य करतांना येणारे अडथळे आणि त्रास दूर होण्यासाठी साधना अन् आध्यात्मिक उपाय यांची जोड द्या, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नौपाडा, ठाणे येथील ब्राह्मण विद्यालयाच्या सभागृहात २६ आणि २७ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या निवासी ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ कार्यशाळेत उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनीही उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील एकूण ४४ धर्मप्रेमींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे मुख्य समन्वयक श्री. सागर चोपदार, मुंबईचे समन्वयक श्री. बळवंत पाठक, ठाणे जिल्ह्याचे समन्वयक श्री. सुनील कदम, रायगड जिल्ह्याचे समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर, सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे, सौ. शैला घाग आदी वक्त्यांनी या कार्यशाळेतील विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. समितीचे श्री. ओंकार नातू, श्री. अमोल पाळेकर यांनीही या कार्यशाळेत शिबिरार्थींना अवगत केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. मनीष माळी यांनी केले. कार्यशाळेतील प्रायोगिक भाग, गटचर्चा, सेवा यांमध्ये उपस्थित धर्मप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यशाळेच्या शेवटी अनेक धर्मप्रेमींनी मनोगत व्यक्त करून साधना करत धर्मकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण’ कार्यशाळेत उपस्थित धर्मप्रेमी

विशेष सहकार्य

१. वर्तकनगर, ठाणे (प.) येथील ब्राह्मण विद्यालयाचे विश्वस्त श्री. केदार जोशी आणि मुख्याध्यापिका सौ. वर्षा हरदास यांनी कार्यशाळेसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. श्री. अरविंद शेट्टी, श्री. अभिषेक वंजारे, श्री. रवींद्र महाजन, श्री. मिलींद खाडे, श्री. नरेंद्र प्रसादे, सौ. सीमा चौधरी, सौ. कीर्ती प्रभु, श्री. शिवाजी काकडे, श्री. उतेकर, श्री. दीपक रानडे, प्रसाद स्वीट्स आदींनी मोलाचे सहकार्य केले.

पू. (सौ.) संगीता जाधव

गुरूंना अपेक्षित अशी साधना करूया ! – पू. (सौ.) संगीता जाधव, सनातन संस्था

अन्याय आणि धर्मांवरील आघात यांविरोधात लढणे ही काळानुरूप साधना आहे. सध्याच्या रज-तमाने युक्त असलेल्या भयानक काळात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ हा साधनेचा मार्ग सांगितला. ज्ञान, ध्यान, निष्कार्म कर्म, भक्ती यांसह ‘सर्वकाही गुरूच करवून घेणार आहेत’, या भावाने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून आपण साधना करत आहोत. आपण गुरूंना अपेक्षित अशी साधना करूया.

वैद्य उदय धुरी

हिंदूसंघटनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची मागणी राष्ट्रीय जागृतीच्या स्वरूपात समाजापर्यंत पोचवायची आहे ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सरकारी कार्यालयापासून प्रत्येक क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार, लोकांच्या वाढत्या समस्या आणि अन्य अपप्रकार यांमुळे लोकशाहीची निरर्थकता सर्वांनाच लक्षात येत आहे. भविष्यकाळात हिंदु राष्ट्र हवे कि इस्लामी राष्ट्र ? असा दोघांपैकी एकच पर्याय आपल्यासमोर असणार आहे. हिंदुसंघटनाच्या माध्यमातून सातत्याने हिंदु राष्ट्राची मागणी राष्ट्रीय जागृतीच्या स्वरूपात समाजापर्यंत पोचवायची आहे. या दिशेने प्रयत्न करत राहिल्यास हिंदु राष्ट्र हे येणारच आहे. या प्रयत्नांना साधनेची जोड देणे आवश्यक आहे.

श्री. किशोर पडवळ

श्री. किशोर पडवळ, खोपोली

हिंदु राष्ट्र हे येणारच आहे; मात्र ध्येय ठेवून प्रयत्न केले, तरच या कार्यात खारीचा वाटा आपल्याला उचलता येणार आहे. ध्येय असल्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही. ‘या कार्यशाळेत आपण वैकुंठात आहोत आणि चैतन्य ग्रहण करत आहोत’, अशी अनुभूती घेता आली.

श्री. राजेश कार्येकर

श्री. राजेश कार्येकर, विक्रोळी

जीवनात हिंदुत्वाचे कार्य करतांना बरेच चांगले-वाईट अनुभव आले. सनातन संस्थेच्या संतांच्या मार्गदर्शनानुसार आणि हिंदु जनजागृती समितीच्या सेवकांसमवेत आपण साधना केल्यास आपला इहलोकी आणि परलोकी नक्कीच उद्धार होईल !

कार्यशाळेत धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेले मनोगत !

  • श्री. सुनील मांगले, अंधेरी – पूर्वी हिंदु जनजागृती समितीच्या सभा आणि अन्य उपक्रम यांत सहभागी झालो होतो; मात्र आजच्या कार्यशाळेचा अनुभव काही वेगळाच होता, या कार्यशाळेतून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा मिळाली.
  • सौ. मधुरा नेज्जुर, अंधेरी – या कार्यशाळेत प्रेमभाव अनुभवता आला. साधनेतील काही गोष्टी ठाऊक होत्या, तर काही गोष्टींचे महत्त्व नव्याने समजले. धर्मजागृतीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत, हे लक्षात आले. आता ठरवले आहे की, धर्मकार्यात, सेवेत मागे हटायचे नाही.
  • कु. प्रथमेश पडवळ, खोपोली – राष्ट्र-धर्म कार्याविषयी निवेदने देणे, विषय मांडणे, प्रसार करणे आदी विविध प्रकारच्या सेवांसमवेत साधनेचे प्रयत्न कसे करायचे ? हे लक्षात आले. कार्यशाळेतून आत्मविश्वास वाढला.
  • श्री. शशिकांत पाटील, खोपोली – गुरुकृपायोगानुसार साधना याविषयी सूत्रे पू. (सौ.) जाधवकाकू सांगत असतांना भाव जागृत झाला. समष्टी सेवा करतांना व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे करावेत ? हे कळले.
  • श्री. दीपक गुप्ता, भिवंडी – धर्मकार्य पूर्वीपासूनच करत होतो. ‘धर्मकार्य करतांना माझे प्रयत्न अल्प पडत आहेत’, असे लक्षात आले. माझे प्रयत्न आणि सेवा वाढवीन.
  • श्री. अशोक म्याना, भिवंडी – या कार्यशाळेत येण्याअगोदर माझा आत्मविश्वास अल्प होता. या कार्यशाळेतून शिकून समाजात जाऊन मी व्यवस्थित धर्मप्रसार करू शकतो, एवढे मला धैर्य मिळाले आहे.
  • श्री. प्रविण राऊत, गोरेगाव – धर्मप्रेमींसाठी कार्यशाळा हा माझा पहिलाच अनुभव होता. हिंदु समाजात लोक धर्मकार्यासाठी काहीतरी प्रयत्न करत आहेत. या सर्वांपर्यंत पोचून हिंदु राष्ट्र आणण्यासाठी सेवारत राहीन.
  • श्री. संदीप ओबोजवार, मालाड – व्यष्टी साधना करत होतो; मात्र समष्टी साधनेचे महत्त्व येथे समजले. ‘आपण किती धावतो यापेक्षा कोणत्या दिशेने धावतो’, हे महत्त्वाचे आहे, हे या कार्यशाळेतून शिकायला मिळाले.
  • सौ. हर्षदा टकले, गोरेगाव – या कार्यशाळेत भावप्रयोगात वैकुंठधाम अनुभवता आले. या कार्यशाळेत ‘अनेक जण अनोळखी असतांना, प्रत्येक जण आपल्यातीलच एक आहे’, हे अनुभवता आले.
  • श्री. जनार्दन जाधव, खोपोली – व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांचे महत्त्व या कार्यशाळेत समजले. प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय यांचे महत्त्व या कार्यशाळेत विविध प्रसंगांतून अनुभवता आले.
  • सौ. स्नेहल पाटील, खोपोली – या कार्यशाळेत शिकायचे आहे, असे ठरवले होते; मात्र देवाच्या कृपेने ठरवल्यापेक्षा जास्त शिकता आले. सेवा करणारे साधक, धर्मप्रेमी यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले.
  • सौ. माधवी शिरसाठ, नेरे, पनवेल – मला या कार्यशाळेत जो आनंद अनुभवता आला, तो यापूर्वी कधीच अनुभवता आला नव्हता. ईश्वरचरणी कृतज्ञ आहे.
  • श्री. विनायक वाकडीकर, शिरढोण (रायगड) – या कार्यशाळेत सर्व सत्रांतून पुष्कळ शिकायला मिळाले. या कार्यशाळेत येण्यापूर्वी काही अडथळे येत होते, त्या अडथळ्यांवर मात करून निश्चय करून येता आले.
  • श्री. सूर्या पटेल, बदलापूर – या कार्यशाळेतून पुष्कळ शिकायला मिळाले. ‘धर्मकार्यासाठी सदैव उपलब्ध रहायला हवे’, असे वाटते.
  • श्री. दयाशंकर राजगोर, ठाणे – या कार्यशाळेचे आयोजन पुष्कळ चांगले होते. मला या कार्यशाळेत सहभागी करून घेतल्याविषयी कृतज्ञ आहे.
  • श्री. सुनील धामणकर, ठाणे – मला बोलतांना अडखळायला होते; मात्र कार्यशाळेत विविध विषयांवर आत्मविश्वासाने बोलता आले.
  • श्री. सूरज ठाकूर, जोगेश्वरी – कोरोनाच्या काळात साधनेमुळे साहाय्य झाले. या कार्यशाळेत सर्वांकडून पुष्कळ शिकायला मिळाले.

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *