Menu Close

EXCLUSIVE : काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या घोर यातना जगाला समजणे अत्यावश्यक !

#KashmirFiles  #TheKashmirFiles  #Kashmir  #Exodus  #Genocide  #VivekAgnihotri

११ मार्च या दिवशी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट जगभरात प्रसारित होत आहे. त्या निमित्ताने…

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत हिंदुत्वनिष्ठ अन् मानवाधिकार कार्यकर्ते यांच्याशी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी साधला संवाद !

आज इतक्या मोठ्या कालावधीनंतर ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून या अत्याचारांना जागतिक पटलावर ठेवण्याचा स्तुत्य नि धाडसी प्रयत्न प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केला आहे. हे करतांना जिहादी अन् त्यांच्या विचारसरणीचे लोक यांच्याकडून त्यांच्या विरोधात अनेक कट रचण्यात आले. अग्निहोत्री यांच्या या प्रयत्नांविषयी अथवा चित्रपटाविषयी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांकडून म्हणावी तशी प्रसिद्धी देण्यात आलेली नाही, हे हिंदूंच्या भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांनी मात्र ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘हिंदुत्व’ यांच्यासाठी कार्यरत असलेल्यांच्या प्रयत्नांना नेहमीच ठळक प्रसिद्धी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून काश्मिरी हिंदूंच्या व्यथा आणि त्या निमित्ताने या चित्रपटाचे प्रयोजन यांसंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय अन् आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत हिंदुत्वनिष्ठ आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.

धर्मनिरपेक्ष भारतामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार करून लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडून स्वत:च्याच देशात निर्वासित होण्यास भाग पाडले. ३० वर्षांपूर्वी झालेल्या या हिंसाचाराविषयी एकाही राजकीय पक्षाने मग तो उजव्या विचारसरणीचा असो की डाव्या, एकाही विचारवंताने आवाज उठवला नाही कि ‘लोकशाहीची हत्या झाली’, असे म्हटले नाही कि ‘पुरस्कार वापसी’सारखी नाटके केली नाहीत. भारत धर्मनिरपेक्ष असूनही त्याची ही धर्मनिरपेक्षता वेशीवर टांगण्यात आली. जगातील स्मशानशांतता काश्मिरी हिंदूंना आज ३ दशकांनंतरही बोचत आहेच !

(सौजन्य : Zee Studios)

मुसलमानांसाठी ५७ देश आहेत; भारत हिंदूंसाठी ‘नो गो एरिया’ कदापि होता कामा नये ! – आरिफ अजाकिया, लंडन

(टीप : ‘नो गो एरिया’ म्हणजे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव असलेले क्षेत्र)

आरिफ अजाकिया, लंडन

पाकिस्तान, तसेच अन्य देशांमध्ये जिहाद्यांकडून हिंदू अन् मुसलमानेतर यांच्यावर होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात आवाज उठवणारे लंडन येथील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया हे नुकतेच भारतात येऊन गेले. देहलीत ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या ‘स्क्रीनिंग’च्या (चित्रपटाच्या प्रचारार्थ तो सर्वत्र प्रसारित होण्यापूर्वी काही लोकांना दाखवण्यात येतो.) वेळी तेही उपस्थित होते. चित्रपटासंदर्भात ‘सनातन प्रभात’च्या एका प्रतिनिधीशी बोलतांना ते म्हणाले, ‘‘३० वर्षांपूर्वी हिंदूंना हिंदु देशातच निर्वासित व्हावे लागले. त्यांच्या नरकसम यातनांना या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली आहे. एखाद्या कटू सत्याला वाचा फोडल्यास त्याला विरोध हा होतोच ! तसाच प्रकार या चित्रपटासंदर्भात होतांना दिसत आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट ही सत्यावर आधारित असून चित्रपट पहातांना डोळ्यांतून अश्रू आल्याखेरीज रहात नाही. चित्रपटाच्या माध्यमातून जिहाद्यांची क्रूरता लक्षात येते. जर हिंदू जागृत झाले नाहीत, तर जसे काश्मीरमध्ये घडले, तसेच बंगाल, केरळ या राज्यांतही घडणार आहे, हे विसरता कामा नये.

भारत सरकारने काश्मिरी हिंदूंच्या हितासाठी आता तत्परतेने कार्य करायला हवे. फुटीरतावादी नेता यासिन मलिक याच्या सारख्यांचा आजही ‘सरकारी पाहुणा’ म्हणून आदर केला जातो. त्यांना फासावर लटकवायला हवे. हिंदूंची लोकसंख्या कमी होता कामा नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आज मुसलमानांसाठी ५७ देश आहेत. भारत हिंदूंसाठी ‘नो गो एरिया’होता कामा नये !’’

वर्ष १९७१ मध्ये (आजच्या) बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयी यथार्थ चित्रण करणारे चित्रपट प्रदर्शित व्हावेत ! – कोएनराड एल्स्ट, बेल्जियम

इतिहासकर्ता कोनराड एल्स्ट

हिंदु धर्माचे अभ्यासक आणि प्रसिद्ध विचारवंत बेल्जियम येथील कोएनराड एल्स्ट यांना या चित्रपटासंदर्भात संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या पद्धतीला ‘पोगरम’ (pogrom) म्हटले जाते. यांतर्गत काही लोकांना ठार मारून अन्यांना भय दाखवून त्यांना पळवून लावण्यात येते. असेच गेल्या शतकात युरोपातही घडले आहे. नव्वदच्या दशकामध्ये काश्मिरी हिंदूंच्या विरोधात घडलेल्या वंशविच्छेदाला ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांनी वाचा फोडली नाही, तशीच काहीशी रीत पाश्‍चात्त्य देशांतही दिसून येते. इस्लामी आतंकवाद्यांच्या कुकृत्यांना नेहमीच दुर्लक्षिले गेले आहे. जगभरातील सरकारेही मुसलमानांचे लांगूलचालन करण्यास धन्यता मानत आली आहेत. भारतातील विद्यमान सरकार त्याच दिशेने प्रयत्नरत आहे; परंतु त्याचा त्यांना काहीच लाभ होणार नाही.

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक भारतीय हिंदूने हा चित्रपट पहावा. देशातील मुसलमानांनीही हा चित्रपट पाहून जागृत होणे आवश्यक आहे. बहुसंख्य असूनही गरीब हिंदूंवर त्यांच्याच देशात कशा प्रकारे अत्याचार झाले आहेत, हे जगाला कळणे आवश्यक आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी आता वर्ष १९४७ मध्ये भारताच्या फाळणीच्या वेळी, तसेच वर्ष १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानात (आजच्या बांगलादेशमध्ये) हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराविषयी यथार्थ चित्रण करणारे चित्रपट काढावेत.’’

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांविषयी जागतिक समुदायाने जागृत होणे आवश्यक ! – राहत ऑस्टिन, दक्षिण कोरिया

राहत ऑस्टिन, दक्षिण कोरिया

पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू, शीख आणि ख्रिस्ती यांच्या मानवाधिकारांसाठी लढणारे अन् दक्षिण कोरियामध्ये वास्तव्यास असणारे राहत ऑस्टिन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अभिप्राय देतांना हिंदूंच्या दुरवस्थेविषयी दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘काश्मिरी हिंदूंसाठी भारत सरकारने काहीतरी करणे आवश्यक आहे. आम्ही काहीही केले, तरी त्याचा विशेष लाभ होणार नाही. जिहादी आतंकवादाला बळी पडलेले पात्र नेहमी पालटत आले आहेत. आधी राजा दाहिर होता, आज काश्मिरी हिंदू आहेत. यामुळेच ‘इस्लामिक सल्तनतीं’ची निर्मिती होत राहिली आहे. काश्मीरमध्येही तेच घडतांना दिसत आहे. हिंदूंनी कधीच कुणावर आक्रमण केले नाही. आज भारत पुन्हा एकदा फाळणीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पंजाबमध्ये खलिस्तानची मागणी केली जात आहे. जगात केवळ हिंदूच मानवतावादी दृष्टीकोन ठेवणारे आहेत. आज भारतात राष्ट्रवाद जागृत होण्याची आवश्यकता आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदू त्यांच्याच देशात मार खात आले आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांविषयी जागतिक समुदायाने जागृत होणे आवश्यक आहे.’’

(सौजन्य : ABP NEWS HINDI)

The Kashmir Files- Vivek Agnihotri ने विवाद करनेवालों की धज्जीयां उड़ाई,ये इंटरव्यू आंखें खोल देगा

भारतीय हिंदूंसमवेतच येथील मुसलमानांनीही हा चित्रपट आवर्जून पहाणे आवश्यक ! – मारिया वर्थ, जर्मन लेखिका, भारत

मारिया वर्थ, जर्मन लेखिका

मूळच्या जर्मनी येथील आणि गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहून हिंदु धर्माचा सखोल अभ्यास करणार्‍या प्रसिद्ध लेखिका मारिया वर्थ यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘मी केवळ ८ वर्षे वयाची असतांनाही वर्ष १९५९ मध्ये तिबेटमध्ये दलाई लामा आणि त्यांचे अनुयायी यांचे जे विस्थापन झाले, ते मला चांगले आठवते. त्याविषयी मला सर्व माहिती मिळाली होती; परंतु वर्ष १९७१ मध्ये जेव्हा तत्कालीन पूर्व पाकिस्तानात लक्षावधी हिंदूंवर अत्याचार करण्यात आले, तेव्हा माझे वय २१ वर्षे असूनही मला त्याविषयी काहीच ठाऊक नव्हते. वर्ष १९९० मध्ये मी भारतात स्थायिक झाले. तेव्हा काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद झाला. तरीही ४० वर्षे वयाची माझ्यासारखी महिला त्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होती. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची आज पुष्कळ आवश्यकता होती. भारतीय हिंदूंसमवेतच येथील मुसलमानांनीही हा चित्रपट आवर्जून पहाणे आवश्यक आहे. त्यातून अंतर्मुख होऊन त्यांनी विचार करायला हवा की, त्यांच्या सर्वोच्च धार्मिक शक्तीने त्यांना अन्य धर्मियांची हत्या करण्यापर्यंत त्रास देण्याविषयी सांगितले आहे का ? एकाच दैवी शक्तीने सर्वांची निर्मिती केलेली असतांना अशी शिकवण दिली जाणे शक्य आहे का ? जर मुसलमानांना पंथ आधी येत असेल, तर हिंदूंना त्यांचा धर्म प्रथम प्राधान्याचा आहेच !’’

नरसंहाराला ‘पलायन’ म्हणून काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाची दाहकता न्यून करण्याचा प्रयत्न ! – अंकुर शर्मा, अध्यक्ष, ‘इक्कजुट जम्मू’ संघटना

अंकुर शर्मा, अध्यक्ष, ‘इक्कजुट जम्मू’ संघटना

काश्मिरी हिंदूंच्या हितासाठी लढणार्‍या जम्मू येथील ‘इक्कजुट जम्मू’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे अध्यक्ष श्री. अंकुर शर्मा यांच्याशी वार्तालाप करतांना समजले की, जम्मू येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या नुकत्याच झालेल्या स्क्रीनिंगच्या वेळी ते स्वत: उपस्थित होते. त्यांनी चित्रपटासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले, ‘‘चित्रपटाची निर्मिती होणे, हे कौतुकास्पद पाऊल आहे. तत्कालीन केंद्र सरकारने हिंदूंच्या नरसंहाराकडे कशा प्रकारे कानाडोळा केला किंबहुना ते मूकदर्शकच राहिले, याचे वास्तविक वर्णन या चित्रपटातून करण्यात आले आहे. नरसंहाराला पलायन म्हणून काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाची दाहकता न्यून केल्याचा, तसेच हिंदूंवरील अत्याचारांवर प्रकाश टाकण्याचा या चित्रपटातून प्रयत्न झाला आहे. ‘जिहाद’चे षड्यंत्र कशा प्रकारे राजकीय स्तरावर, तसेच प्रसारमाध्यमांद्वारे कार्यरत असते, हे या चित्रपटातून लक्षात येईल. ‘मुस्लिम ब्रदरहूड’च्या नावाखाली लोकशाही राष्ट्रे कशा प्रकारे खिळखिळी केली जात आहेत, हे हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्ययास येऊ शकेल. जोपर्यंत हिमालयाचे इस्लामीकरण होत नाही, तोपर्यंत सनातन धर्माचे इस्लामीकरण होऊ शकत नाही. हिमालय हे सनातन हिंदु धर्माचे उगमस्थान राहिले आहे. त्यामुळे पहिल्यांदा काश्मीरवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. सरकारी स्तरावर काश्मीरचे इस्लामीकरण करणे चालू आहे. काश्मीरनंतर जर जम्मूही हिंदूंच्या हातातून निसटले, तर पुढील काळ भयावह आहे. भारतीय राज्यप्रणाली ही सनातन वैदिक हिंदु धर्माच्या सभ्यतेच्या विरोधात आहे.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *