Menu Close

(म्हणे) ‘पगडी आणि टिळा यांना अनुमती आहे, तर हिजाबला काय अडचण आहे ?’ – माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस्.वाय.कुरेशी

  • पगडी वापरणे हा शिखांच्या धर्माचा, तर टिळा लावणे हा हिंदूंच्या धर्माचा अनिवार्य भाग आहे; मात्र हिजाब घालणे हा मुसलमानांच्या धर्माचा अनिवार्य भाग नाही, त्यामुळेच त्याला अनुमती नाही, अशाच प्रकारचा निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे, हे कुरेशी का समजून घेत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • मुसलमान व्यक्ती कितीही मोठ्या पदावर गेली, तरी ती त्याच्या धर्माची बाजू सतत मांडत असते, तर हिंदु व्यक्ती मोठ्यावर पदावर असली किंवा नसली, तरी ती आत्मघातकी धर्मनिरपेक्षताच आयुष्यभर जपत असते, याचे हे उदाहरण ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस्.वाय. कुरेशी

नवी देहली – हिजाब कुराणाचा भाग नाही; मात्र सोज्वळ दिसणारे कपडे घालावेत, असे त्यात म्हटले आहे. शाळेच्या गणवेशामध्ये शिखांना पगडी आणि अन्यांना टिळा लावण्याची अनुमती दिली जाते, तर हिजाबला अनुमती देण्यास काय अडचण आहे ? हिजाब आवश्यक आहे कि नाही, हे मौलाना सांगू शकतील. ते सूत्र त्यांच्या अखत्यारीत आहे. या उलट मौलाना (इस्लामी विद्वान) जर भारतीय दंड विधानाविषयी निर्णय देऊ लागले, तर ते योग्य होईल का ?, असा प्रश्‍न भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस्. वाय. कुरेशी यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

कुरेशी यांनी मुलाखतीत केलेली काही विधाने

१.  (म्हणे) ‘सुशिक्षित हिंदु मुली सुशिक्षित मुसलमान मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करतात !’

‘लव्ह जिहाद’ हा केवळ दुष्प्रचार आहे. यात मुसलमान मुलींचीच हानी होत आहे. कारण सुशिक्षित हिंदु मुली सुशिक्षित मुसलमान मुलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुळे मुसलमान मुलींना अशी मुले मिळत नाहीत. (असा तर्क म्हणजे कुरेशी यांचा जावईशोधच होय ! लव्ह जिहादच्या सहस्रो प्रकरणांमध्ये मुसलमान तरुण हिंददु मुलींना ‘हिंदू’ असल्याचे खोटे सांगून जाळ्यात ओढतात आणि त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करून लैंगिक शोषण करतात, हे कुरेशी जाणीवपूर्वक सांगण्याचे टाळतात, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. (म्हणे) ‘पुढील १ सहस्र वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या वाढून मुसलमान पंतप्रधान होऊ शकत नाही !’

मुसलमानांमध्ये कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण अल्प आहे; मात्र याचा संबंध धर्माशी नाही. जर असे म्हटले जात असेल की, मुसलमान लोकसंख्या वाढवत आहेत, तर ते चुकीचे आहे. पुढील १ सहस्र वर्षांत मुसलमानांची लोकसंख्या वाढून मुसलमान पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. (मुसलमानांची लोकसंख्या ४० टक्के जरी वाढली, तरी काश्मीरमध्ये जे हिंदूंचे झाले, तेच संपूर्ण देशात हिंदूंचे होईल, हे हिंदूंना ठाऊक झाले आहे. हीच गोष्ट कुरेशी सांगत नाहीत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३. (म्हणे) ‘धर्मनिरपेक्ष हिंदूंना कट्टरतावादी बनवले जात आहे !’

कुरेशी म्हणाले की, उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झालेले विजय कट्टरतावादाचा विजय आहे; कारण देशात ध्रुवीकरणाचे युग चालू आहे. पहिले ध्रुवीकरण फाळणीच्या वेळी, दुसरे बाबरीच्या वेळी, तर तिसरे आता चालू आहे. हिंदूंचा स्वभाव धर्मनिरपेक्षतावादी आहे; मात्र आज त्यांना कट्टरतावादी बनवले जात आहे. (हिंदूंना आता ढोंगी धर्मनिरपेक्षतेतून जागे केले जात असल्याने त्यांना वस्तूस्थिती कळू लागली आहे. याचाच धर्मांधांना आणि निधर्मीवाद्यांना त्रास होत आहे. त्यातूनच ते अशी विधाने करत आहेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

४. ईव्हीएम् यंत्रामध्ये घोटाळा होऊ शकत नाही !

इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र विश्‍वासार्ह आहे. जर यात गडबड करता येणे शक्य असते, तर बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला नसता.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *