Menu Close

‘हुकूमशहा हिटलरच्या काळात ‘द कश्मीर फाइल्स’ सारखे चित्रपट झाले होते !’ – तिस्ता सेटलवाड

काश्मिरी हिंदूंवरील अनन्वित अत्याचारांविषयी काडीमात्र संवेदनशीलता नसलेल्या पत्रकार तिस्ता सेटलवाड यांचा हिंदुद्वेष !

पत्रकार तिस्ता सेटलवाड

मुंबई  – काश्मीरमधील आतापर्यंतच्या निवडणुकीत कुणीही काश्मीरमधील हिंदूंविषयी वक्तव्य केले नव्हते. सध्या मात्र धर्माच्या नावावरून राजकारण चालू आहे. ही गोष्ट निंदनीय आहे. भाजप तिकिटे काढून नागरिकांना हा चित्रपट पहाण्यासाठी पाठवत आहे. यामागे भाजपचे हित लपले आहे. हिंदू-मुसलमान यांच्यात मतभेद निर्माण करण्यासाठी भाजपने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हुकूमशहा हिटलरच्या काळात अशी कार्यपद्धत अवलंबली जात होती. हिटलरच्या काळात असे चित्रपट झाले होते, असे हिंदुद्वेषी वक्तव्य कथित पत्रकार तिस्ता सेटलवाड यांनी केले.

१ एप्रिल या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात ‘युनायटेड अगेंस्ट फोरम’च्या वतीने ‘अगेंस्ट बिहाइन्ड द कश्मीर फाइल्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. उपस्थित वक्त्यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काल्पनिक आहे, तसेच काश्मीरमध्ये मुसलमानांवरही अत्याचार झाले’, हे सांगण्याचा प्रयत्न केला. (एखाद्या अल्पसंख्यांकावर अन्याय झाल्यावर ऊर बडवणारी ही मंडळी काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर तोंडही उघडत नाहीत, यावरून ही मंडळी हिंदुविरोधी कार्यक्रम राबवत आहेत, हे स्पष्ट होते ! – संपादक)

(म्हणे) ‘चित्रपटाला अनुमती देतांना तो काल्पनिक असल्याचे नमूद करायला हवे होते !’ – अधिवक्ता मजीद मेनन

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला अनुमती देतांना परिनिरीक्षक मंडळाने ‘हा चित्रपट काल्पनिक आहे. त्याचा काश्मीर येथील जनतेशी काडीमात्र संबंध नाही’, असे प्रसिद्ध करणे आवश्यक होते. आतापर्यंत अनेक सरकारे केंद्रात आली; परंतु कुणीही काश्मीरमधील घटनेविषयी काहीही मत मांडलेले नाही. ३७० कलम हटवून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे भाजपने हा चित्रपट निर्माण केला. (मुंबईतील बाँबस्फोटातील आरोपींचा खटला लढणारे अधिवक्ता यापेक्षा वेगळे काय सांगणार ? – संपादक)

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात विष पेरण्याचे काम करत आहे !’ – बी.जी. कोळसे पाटील, माजी न्यायमूर्ती

बी.जी. कोळसे पाटील, माजी न्यायमूर्ती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात विष पेरण्याचे काम करत आहे. ‘आम्ही देशाचे मालक आहोत’, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते. काश्मिरी हिंदूंना मोदी शासनाकडून काहीच मिळाले नसल्याचे सांगतात. हे सरकार संघाच्या आदेशावर चालत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट काढून सर्वसामान्य हिंदू-मुसलमान लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भाजप सरकार हिंदू-मुसलमान यांच्यात द्वेष निर्माण करत आहे. (काश्मिरी हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या धर्मांधांविषयी, धर्मांधांच्या अतिरेकी कारवायांविषयी बोलण्याचे धारिष्ट्य नसलेले लोक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मात्र अतिरेकी ठरवत आहेत. असे दुजाभाव असलेले न्यायमूर्ती लाभणे हे न्यायव्यवस्थेचे दुर्दैव आहे ! – संपादक)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *