Menu Close

संतांना विरोध करणार्‍या जातीयवाद्यांना थारा देऊ नका – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

दापोली येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती

दापोली – ‘श्रीसमर्थ संप्रदाया’चे पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्यशासनाने २०२२ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. याच पुरस्काराला विरोध करणारी जातीयवादी मंडळी आहेत, त्यांनी आतापर्यंत केवळ जातीयवादाचे विष कालवले आहे. संतांना विरोध करणार्‍या जातीयवाद्यांना थारा देऊ नका !, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, तसेच गोवा आणि गुजरात या राज्यांचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी काढले.

सभेच्या आरंभी वेदमंत्रपठण करतांना ब्रह्मवृंद

श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले की,

समर्थ रामदासस्वामींचे कार्य उच्च कोटीचे आहे. पू. अप्पासाहेब हे रामदासस्वामी यांच्या चरित्रानुसार समाजात प्रबोधनाचे कार्य करतात. त्यांना दिलेल्या पुरस्कारामुळे ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराचाही सन्मान झाला आहे. ज्यांच्यावर खटले आहेत, अशा नट-नट्यांना किंवा ज्यांनी कोट्यवधी रुपयांचा कर चुकवला आहे, त्यांना पुरस्कार दिल्यानंतर ही जातीयवादी मंडळी ‘ब्र’ ही काढत नाहीत. केवळ हिंदूंना संघटित होण्याची दिशा दाखवणार्‍यांनाच जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. ब्राह्मणद्वेषामुळे बाबासाहेब पुरंदरे यांनाही पुरस्कार देण्यात आल्यानंतर असाच विरोध केला होता. हिंंदु धर्माला विरोध करणे, हाच यांचा एकमेव अजेंडा आहे. शासनाचे याचा वेळीच बंदोबस्त करावा. हिंदू केवळ संख्येने मोठे असून चालणार नाहीत, तर संघटित राहिले पाहिजे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवांच्या नावाखाली कार्यक्रमांची अनुमती मागितली जात आहे. मुलांसमोर धर्माच्या विरोधात बोलले जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याला अनुमती देण्यात आली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या विरोधामुळे ही अनुमती मागे घेण्याची भाषा ते करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव आधी ‘नास्तिकतावादी मंच’ होते. ज्यांच्या नावातच नास्तिकता आहे, हे आस्तिकता काय शिकवणार ?

श्री. मनोज खाडये

कोकणातील ६ सहस्र एकर भूमी वक्फ बोर्डाच्या कह्यात आहे, त्यामध्ये दापोलीसारखा तालुका वरच्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे वक्फ बोर्डाचे पाशवी अधिकार काढून घेण्यात यावेत, अशी आम्ही मागणी करत आहोत.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला वेग आणि बळ मिळावे, यांसाठी साधनेचा निश्‍चय आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये

सद्गुरु स्वाती खाडये

समानतेवर आधारित असलेली भारतीय राज्यघटना हिंदूंच्या संदर्भात मात्र असमानतेचे तत्त्व अंगीकारते. मुसलमानांना मदरशांतून, ख्रिस्त्यांना चर्चमधून धर्मशिक्षण मिळते; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याचे कोणतेही ठिकाण नाही. हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत असलेली आणि हिंदूंना धर्माशी जोडून ठेवणारी मंदिरे उत्पन्नासाठी सरकार स्वत:च्या कह्यात घेते. हिंदूंही पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानत आहेत. आपल्या महान संस्कृतीविषयी असलेले अज्ञान आणि धर्माचरणाचा अभाव, ही याची मुख्य कारणे आहे. हिंदु धर्माला अध्यात्माची मोठी देणगी लाभली आहे; मात्र सध्याचा हिंदु समाज उपासनाच करत नसल्याने त्याला आध्यात्मिक बळही लाभत नाही. हिंदूंना अध्यात्माचे शिक्षण देण्यासाठी सनातन संस्था प्रयत्नशील आहे.

अनेक संत, भविष्यवेत्ते, द्रष्टे यांनी येणारा आपत्काळ भयंकर असणार, असे सांगून ठेवले आहे. हिंदु धर्मशास्त्र सांगते, ‘धर्माचा र्‍हास होऊन अधर्म बळावला की, पृथ्वीवर संकटे येतात.’ कोरोना महामारीच्या रूपात आपत्काळाची झलक आपण अनुभवली आहे. रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही संपलेले नाही. नैसर्गिक आपत्तींची मालिकाही चालू आहे. ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस येतो, त्याप्रमाणे कालचक्रानुसार कलियुगांतर्गत कलियुग संपून कलियुगांतर्गत सत्ययुग आरंभ होणारच आहे, हेच ‘हिंदु राष्ट्र’ असणार आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला वेग आणि बळ मिळण्यासाठी प्रतिदिन साधना करण्याचा निश्‍चय करूया !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘आजपासून सर्वजण धर्माचरण करणार ना ? करणार, तर तसे भगवान श्रीकृष्णाला वचन द्या !’ असे आवाहन उपस्थितांना केले, तर श्री. खाडये यांनी ‘हिंदु राष्ट्राचे समर्थन करण्यासाठी एकत्र आलो आहात ना ?’, असे विचारले. तेव्हा सर्व धर्मप्रेमींनी दोन्ही हातांच्या वज्रमुठी वर करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

देशातील संभाव्य फाळण्या रोखण्यासाठी कठोर धर्मांतर बंदी कायदा हवा ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

अधिवक्ता नीलेश सांगोलकर

‘धर्मांतर’ हे हिंदुत्वासमोरील मोठे आव्हान आहे. बळजोरीने, फसवून किंवा आमीष दाखवून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. कोरोना महामारीच्या अवघ्या दीड-दोन वर्षांच्या काळात १ लाख हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले. २५ वर्षांत भारतात जेवढी चर्च बांधण्यात आली, त्यापेक्षा अधिक चर्च कोरोना महामारीच्या काळात उभारण्यात आली. धर्मांतराच्या वाढत्या कारवायांमुळे आज देशातील ९ राज्यांत हिंदु अल्पसंख्य झाले आहेत. ज्या राज्यात हिंदु अल्पसंख्य होतात, त्या राज्यात भारतविरोधी शक्ती बळावतात, हा इतिहास आहे. ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच आहे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते. देशातील संभाव्य फाळण्या रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे.

आपल्या पूर्वजांच्या कृपेमुळे आपण हिंदु म्हणून जगू शकतो; परंतु आपल्या पुढील पिढ्यांनी ‘हिंदु’ म्हणून जगावे, यासाठी आज आपण संघटित होणे आणि धर्मासाठी अधिकाधिक वेळ देणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समिती हिंदुत्वनिष्ठांचे प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी एक एक पाऊल पुढे टाकत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही समितीच्या या कार्याला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. दापोलीतील हिंदु राष्ट्र-जागृती सभेस ५ सहस्र हिंदु धर्मप्रेमींनी संघटित होत ‘आमचा या कार्याला पाठिंबा असून हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आम्हीही सहभागी आहोत’, याची प्रचीती दिली. या वेळी धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आर्य सनातन हिंदु धर्माचा विजय असो’, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो’, आदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

येथील आझाद मैदानात ही सभा झाली. सभेच्या प्रारंभी सनातन संस्थेचे श्री. ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद केला. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी दीपप्रज्वलन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला श्री. मनोज खाडये यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी व्यासपिठावर सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकरही उपस्थित होते. पुरोहित श्री. मनोज परांजपे आणि त्यांचे सहकारी श्री. सौरभ परांजपे, श्री. विनायक जोशी यांनी चैतन्यमय वाणीत वेदमंत्रपठण केल्यानंतर मान्यवर वक्त्यांनी त्यांच्या तेजस्वी वाणीने उपस्थितांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख करून देतांना श्री. परेश गुजराथी
सभेचे सूत्रसंचालन करतांना श्री. महेश लाड आणि सौ. साधना जरळी

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी करून दिली. सभेचे सूत्रसंचालन श्री. महेश लाड आणि सौ. साधना जरळी यांनी केले. ब्रह्मवृंदांचा सत्कार समितीचे श्री. शांताराम मांडवकर यांनी केला.

सभेला उपस्थित धर्माभिमानी

 क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचे स्मरण करून देणारा बालकक्ष

क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचे स्मरण करून देणार्‍या बालकक्षात जिजामाता यांच्या वेशभूषेत कु. ईश्‍वरी गुळेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर कु. चैतन्य खेराडे, सूत्रसंचालन कु. वैदही कदम, सुभाषचंद्र बोस कु. संभव धनावडे, झाशीची राणी कु. सृष्टी धनावडे आणि कु. अथर्व राऊत या बालसाधकांनी भाग घेतला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *