![](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2023/06/Hindu_Adhiveshan_2023_D04_S05_01.jpg)
राष्ट्रनिर्माणासाठी त्याग आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रती निष्ठा आवश्यक ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
![](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2023/06/Hindu_Adhiveshan_2023_D04_S05_02.jpg)
राष्ट्ररचना ही शास्त्रीय संकल्पना आहे. ती सत्यावर आधारित आहे. यामध्ये असत्याला स्थान नाही.‘राष्ट्रनिर्माण’ हे सत्तेची लालसा बाळगणार्यांचे काम नाही. राष्ट्र निर्माणासाठी त्याग आणि राष्ट्र अन् धर्म यांप्रती निष्ठा यांची आवश्यकता आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष १९९८ मध्ये ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘आध्यात्मिक राष्ट्ररचने’चा सिद्धान्त मांडला आहे. हिंदु राष्ट्र अर्थात् रामराज्याप्रमाणे सात्त्विक समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने साधना करायला हवी. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी म्हटले आहे, ‘‘अनेक संतांकडे आणि आध्यात्मिक संस्थांकडे लाखो विदेशी साधना शिकण्यासाठी येतात. साधना शिकून ती आचरणात आणतात. त्यामुळे समुद्रकिनारे, मसाज पार्लर, बार इत्यादींची विज्ञापने करून रज-तमप्रधान पर्यटकांना आकृष्ट करण्याऐवजी रामसेतू, द्वारका, अयोध्या इत्यादींसह भारताचे आध्यात्मिक महत्त्व जगाला सांगितले, तर जाहिरातींवर एक रुपयाही खर्च न करता पर्यटकांच्या अनेक पटींनी अधिक संख्येने अध्यात्मातील जिज्ञासू भारतात येतील.’’
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल. हिंदु राष्ट्र निर्माणाच्या या ईश्वरी कार्यात आपल्याला आध्यात्मिक बळाची आवश्यकता आहे, याची जाणीव ठेवून आज नाही तर, आत्तापासून साधनेला आरंभ करूया, असे उद्गार सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
हिंदु जनसंघर्ष मोर्चाचे जनआंदोलन हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत चालू ठेवूया ! – कु. प्रियांका लोणे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, संभाजीनगर
![](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2023/06/Hindu_Adhiveshan_2023_D04_S05_03.jpg)
गत वर्षी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत निघालेल्या हिंदु जनसंघर्ष मोर्च्यांतील हिंदूंची एकजूट बघून सर्व राजकीय पक्षांना स्वार्थ सोडून एकत्र यावे लागले. या मोर्च्यांमुळे हिंदूंमधील आत्मविश्वास वाढून हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात एकत्रित लढण्याची मानसिकता निर्माण झाली आणि याची झलक श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीनंतर पहायला मिळाली. एरव्ही अशा घटना घडल्यावर हिंदूंमध्ये तणाव असायचा. या वेळी मात्र हिंदूंनी तणाव न बाळगता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून श्रीरामनवमी उत्साहात साजरी केली. हा खूप मोठा सकारात्मक पालट मोर्च्यांनंतर दिसून आला. हे मोर्चे म्हणजे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम ठरत आहेत. यापुढे न थांबता आपल्याला हिंदूंवरील विविध आघातांना वाचा फोडायची आहे. जोपर्यंत मातृभूमीतून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे षड्यंत्र नष्ट होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालू ठेवायचा आहे. हिंदु जनसंघर्ष मोर्चे हे हिंदु राष्ट्रासाठी टाकलेले पाऊलच आहेत, असे आश्वासक उद्गार हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर येथील समन्वयक कु. प्रियांका लोणे यांनी काढले. त्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होत्या.
हरियाणातील धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांना तोंड देणे श्रीकृष्णाच्या कृपेने शक्य ! – कृष्ण गुर्जर, प्रांत सुरक्षा प्रमुख, बजरंग दल, हरियाणा
![](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2023/06/Hindu_Adhiveshan_2023_D04_S05_04.jpg)
रामनाथी – हरियाणातील मेवातला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटले जाते. पूर्वी तेथे हिंदु मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण करण्यात येत होते आणि हिंदु तरुणांच्या हत्या करण्यात येत होत्या. त्यामुळे हिंदूंनी घरदार सोडून मोठ्या प्रमाणात पलायन केले. त्या प्रकरणी स्वामी धरमदेव आणि जनरल जी.डी. बक्षी यांच्यासह एक समिती स्थापन करण्यात आली. तेव्हा गेल्या २५ वर्षांमध्ये तेथे १०२ गावे हिंदुविहिन झाली असून १२३ गावांमध्ये केवळ १०५ हिंदु कुटुंबे शिल्लक राहिली असल्याचे समोर आले. हे लक्षात आल्यानंतर बजरंग दलाने काही साहसयात्रा काढल्या. त्यामुळे हिंदूंचे धैर्य वाढले आणि त्यांनी पलायन न करता त्याविरोधात पराक्रमाने तोंड देण्याचा निर्धार केला. राज्यात बजरंग दलाने धर्मांधांनी बांधलेल्या अवैध मशिदी आणि मजार यांचे अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. यासमवेतच दलाने लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, गोरक्षण, दलित अन्याय निवारण आदींसाठी कार्य केले. ‘गोरक्षण करतांना गोतस्कर गोरक्षकांवर गोळीबार करतात. त्यासाठी आम्हाला शस्त्रअनुमती मिळावी’, अशी आमची सरकारकडे मागणी आहे; पण सरकार याविषयी उदासीन आहे. हे सर्व कार्य बजरंग दलाचे नाही, तर केवळ भगवान श्रीकृष्णाचे आहे. त्याच्या कृपेनेच आम्ही ते करू शकत आहोत, असे उद्गार हरियाणा येथील ‘बजरंग दला’चे प्रांत सुरक्षा प्रमुख श्री. कृष्ण गुर्जर यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.
या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर येथील समन्वयक कु. प्रियांका लोणे, केरळ येथील श्री. राकेश नेल्लिथया हे मान्यवर उपस्थित होते.
निधर्मी सरकारकडून केरळमधील हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न ! – राकेश नेल्लिथया, केरळ
![](https://www.hindujagruti.org/wp-content/uploads/2023/06/Hindu_Adhiveshan_2023_D04_S05_05.jpg)
रामनाथ देवस्थान – केरळमधील स्थिती अतिशय भयावह आहे. तेथे मुसलमान पंथियांची लोकसंख्या ३० टक्के झाली आहे. त्यामुळे काश्मीरसारखी परिस्थिती बनत चालली आहे. हिंदुत्वनिष्ठांना साम्यवादी आणि धर्मांध यांच्या समवेत धर्मनिरपेक्ष हिंदूंच्या विरोधातही लढावे लागत आहे. तेथे पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा चालायच्या. त्याला विरोध झाला. त्यामुळे त्यांनी त्या मंदिरांमध्ये भरवायला प्रारंभ केला. एक दिवस केरळ सरकारने, ‘कोणत्याही मंदिरांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा चालू देणार नाही’, असा आदेश दिला. त्यामुळे तेथे संघाच्या शाखा चालवणे कठीण बनले आहे, असे संतप्त उद्गार केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. राकेश नेल्लिथया यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सावाच्या चतुर्थ दिनी (१९.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते. या वेळी व्यासपिठावर हरियाणा येथील ‘बजरंग दला’चे प्रांत सुरक्षा प्रमुख श्री. कृष्ण गुर्जर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर येथील समन्वयक कु. प्रियांका लोणे हे मान्यवर उपस्थित होते.
श्री. राकेश नेल्लिथया या वेळी पुढे म्हणाले,
‘‘केरळमध्ये धर्मांधांनी मोठ्या प्रमाणावर ‘ड्रग्ज जिहाद’ (अमली पदार्थांचा जिहाद) चालू केला आहे. या माध्यमातून ते शाळेत शिकणार्या मुलांना लक्ष्य करत आहेत. मागे केरळमध्ये १ लाख कोटी रुपयांची अमली पदार्थांची तस्करी पकडण्यात आली. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट हा धर्मांधांच्या कारवायांचा एक छोटासा भाग आहे. त्याहून अधिक भयानक परिस्थिती तेथे आहे. केरळमध्ये मंदिरांना धार्मिक नाही, तर सार्वजनिक ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे. या माध्यमातून निधर्मी सरकारकडून हिंदु धर्म आणि संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा केवळ एकट्या केरळचा नाही, तर संपूर्ण भारताचा प्रश्न आहे. त्यामुळे केवळ मधील हिंदुविरोधी कारवायांची संपूर्ण देशात चर्चा होणे आवश्यक आहे. तसेच याकडे समस्त भारतियांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.’’