Menu Close

‘हिंदुविरोधी शक्तींचा प्रतिकार’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशी द्वितीय सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

डावीकडून श्री. अनिल भाई शास्त्री, श्री. सतिश कुमार, श्री. अर्जुन संपथ कर्नल करतार सिंह मजीठिया, श्री. रमेश शिंदे आणि सूत्रसंचालन करतांना साै. क्षिप्रा जुवेकर

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन !

डावीकडून श्री. सतिश कुमार, श्री. अर्जुन संपथ, पुस्तक प्रकाशित करतांना कर्नल करतार सिंह मजीठिया आणि श्री. रमेश शिंदे

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये २०.६.२०२३ या दिवशी ‘कृपाल रूहानी फाऊंडेशन’चे कर्नल करतार सिंह मजीठिया यांच्या हस्ते ‘हलाल सर्टिफिकेशन : वैश्विक अर्थव्यवस्थेवर आक्रमण’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये ‘ॲमेझॉन किंडल’वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. हे पुस्तक हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केले आहे. या वेळी व्यासपिठावर तमिळनाडू येथील ‘हिंदू मक्कल कत्छी’ (हिंदु जनतेची आघाडी) या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ, ‘गोरक्षक दला’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सतीश कुमार आणि श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते.

शीख, जैन, बौद्ध यांनी ‘हिंदु’ आहोत, हे समजून घ्यायला हवे ! – कर्नल करतार सिंह मजीठिया, कृपाल रूहानी फाऊंडेशन, गोवा

कर्नल करतार सिंह मजीठिया, कृपाल रूहानी फाऊंडेशन, गोवा

विद्याधिराज सभागृह – कोणताही महात्मा जगात येऊन धर्म निर्माण करत नाही. प्रभु श्रीराम, गुरुनानक, गुरुगोविंदसिंह यांनी कोणताही धर्म निर्माण केला नाही. धर्माचे ठेकेदार असतात, ते धर्म निर्माण करतात. विश्‍वात केवळ हिंदु धर्मच आहे. जैन, बौद्ध, शीख हे हिंदु आहेत. आमचे पूर्वज हिंदूच होते. माझ्या आजोबांनी शीख पंथ स्वीकारला. आपले अस्तित्व आपण समजून घ्यायला हवे. आपल्याला बलवान व्हावे लागेल. आपल्या मुलांना आपला इतिहास सांगावा लागेल. जालीयनवाला बागेत गोळीबार करून सहस्रावधींची हत्या करण्याचा आदेश देणार्‍या जनरल डायर याला क्रांतीवीर उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन ठार मारले. शीख कुणाला सोडत नाहीत. अशी मानसिकता हिंदूंमध्येही असायला हवी. धर्माच्या रक्षणासाठी हिंदूंना कुणावरही अवलंबून रहाता येणार नाही. हिंदु धर्म आणि मंदिरे यांवर आक्रमण करणार्‍यांना हिंदूंनी सोडू नये. हिंदूंनी कुणावर आक्रमण करू नये; मात्र स्वत:च्या रक्षणासाठी हिंदूंना सिद्ध रहायला हवे, असे वक्तव्य कृपाल रूहानी फाऊंडेशनचे कर्नल करतार सिंह मजीठिया यांनी केले.

अखंड भारतासाठी गोहत्या थांबवणे आवश्यक ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गौरक्षा दल

सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल

रामनाथी – ज्या देशात ८० टक्के जनता सनातन धर्माशी संबंधित आहे, त्याच देशात सनातन धर्माच्या श्रद्धेशी संबंधित गोमातांची हत्या होत आहे. जेव्हापासून देशात गोहत्या चालू झाली, तेव्हापासून अखंड भारताचे तुकडे झाले. गोमाता ही धरतीमातेचे रूप आहे. ज्या भूमीवर तिचे तुकडे होतील, त्या भूमीचेही तुकडे होतील. त्यामुळे अखंड भारत हवा असेल आणि त्याचे विभाजन थांबवायचे असेल, तर गोहत्या थांबवणे आवश्यक आहे, असे मत पंजाब येथील ‘गौरक्षा दला’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सतीश कुमार यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ५ व्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले,

१. भारतातील गायी बांगलादेशात पाठवल्या जातात. त्या बदल्यात बनावट नोटा आणि अमली पदार्थ भारतात पाठवले जातात. त्याच्या व्यवसायातून मिळालेल्या पैशाने देशात आतंकवाद पसरवला जात आहे. त्यामुळे ही गोतस्करी थांबवणे एक धर्मकार्य आहे.

२. खलिस्तानी आतंकवाद हा हिंदू आणि शीख यांना तोडण्याचा प्रयत्न आहे. कोणालाही खलिस्तानी राज्य नको आहे. विदेशी शक्ती धनाच्या बळावर भारतात निरपराध लोकांची हत्या करून घेत आहेत.

३. युद्धाशिवाय काहीही मिळत नाही. पांडवांना केवळ ५ गावांसाठी युद्ध करावे लागले. आपल्याला तर हिंदु राष्ट्र हवे आहे. हिंदु राष्ट्रासाठी लढा देतांना मृत्यू आला, तर मोक्ष मिळेल आणि जिवंत राहिल्यास हिंदु राष्ट्र मिळेल. हिंदु राष्ट्राच्या आवाज आता मोठा मोठा होत चालला आहे.

तामिळनाडूमधील हिंदुविरोधी कारवायांना सरकारी पाठिंबा ! – श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तामिळनाडू

श्री. अर्जुन संपत, संस्थापक अध्यक्ष, हिंदू मक्कल कत्छी, तामिळनाडू

तमिळनाडूमध्ये मुसलमान कट्टरपंथी, ख्रिस्ती मिशनरी, साम्यवादी, प्रसारमाध्यमे आणि सत्ताधारी द्रमुक पक्ष हे हिंदुविरोधी कारवाया करत आहेत. राज्यातील मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ देशविरोधी शक्तींच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरवत आहेत. तमिळनाडूमध्ये मात्र मुख्यमंत्री स्टॅलिन राज्यातील मंदिरांवर बुलडोझर फिरवत आहेत. सरकारने १६० मंदिरे पाडली. तमिळनाडूमधील दलितांमध्ये हिंदुविरोधी प्रचार केला जात आहे. शाळांमध्ये ख्रिस्ती मिशनरी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत. त्याला सरकारकडून साहाय्य केले जात आहे. सरकारकडून ब्राह्मण, संस्कृत आणि हिंदी यांच्या विरोधी कारवाया चालू आहेत. ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून शहरी नक्षलवादी कारवायांना साहाय्य केले जात आहे. तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुविरोधी कारवाया चालू असल्या, तरी तमिळनाडू ही मूळ हिंदूंची पुण्यभूमी आहे. नवीन संसदेमध्ये नेण्यात आलेला ‘सांगोल’ (धर्मदंड) या भूमीतूनच नेण्यात आला. ज्या ठिकाणी स्टॅलिन यांनी हिंदुविरोधी बैठका घेतल्या, त्याच ठिकाणी आम्ही शिवाचार्य संप्रदायाच्या समवेत बैठकांचे आयोजन करून हिंदूंचे संघटन केले. मंदिरे आणि गोमाता यांच्या रक्षणासाठी आम्ही अभियान चालू केले आहे. तमिळनाडूमधील प्रत्येक राज्यात हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना तमिळनाडूनमधून होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशी माहिती तमिळनाडूतील हिंदू मक्कल कत्छीचे संस्थापक अध्यक्ष श्री. अर्जुन संपत यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी केले.

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात तीव्र लढा आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक

मोहन गौडा, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक

रामनाथ देवस्थान – प्रत्यक्षात मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ची इस्लामी संकल्पना आज शाकाहारी पदार्थ, औषधे, रुग्णालये, इमारती, उपाहारगृहे, पर्यटन, संकेतस्थळे आदी प्रत्येक क्षेत्रांत लागू करण्यात आलेली आहे. केवळ विदेशीच नाही, तर  ‘हलदीराम’, ‘बिकानो’ यांच्यासारखी शाकाहारी पदार्थ बनवणारी भारतीय आस्थापनेही हलाल प्रमाणित खाद्यपदार्थ ग्राहकांना विकत आहेत. हलाल पदार्थांची मागणी केवळ १४ टक्के मुसलमानांची असतांनाही बहुसंख्य हिंदू, तसेच शीख, जैन, बौद्ध, ख्रिस्ती आदी ८६ टक्के जनतेवर ही हलाल उत्पादने लादली जात आहेत. भारतात राज्यघटनेने सर्वांना स्वातंत्र्य दिलेले असतांनाही हिंदूंवर केल्या जाणार्‍या हलालसक्तीच्या विरोधात, तसेच हलालच्या नावे चालू असणार्‍या समांतर अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जनजागृती करण्याची मोहीम मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. तसेच हा जिहाद थांबवण्यासाठी देशभरातील हिंदुत्वनिष्ठ, कायदेविषयक, तसेच सामाजिक क्षेत्रांतील आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींना घेऊन विविध राज्यांत ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना केली जात आहे. एवढ्यावरच न थांबता हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात अधिक तीव्र लढा आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *