Menu Close

‘राष्ट्रसुरक्षा’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पाचव्या दिवशीच्या सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

डावीकडून अधिवक्ता अतुल जेसवानी, नीरज अत्री, अनिल धीर, डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल आणि उद्बोधन करतांना आर्.एस्.एन्. सिंह

‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवरील आक्रमणे आणि ‘कोरोमंडल’ एक्सप्रेसची दुर्घटना यांमागे जिहादी षड्यंत्र ! – आर्.एस्.एन्. सिंह, संरक्षणतज्ञ, देहली

आर्.एस्.एन्. सिंह, संरक्षणतज्ञ, देहली

रामनाथ देवस्थान – काही दिवसांपूर्वी बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात होऊन त्यात ३०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. ३१ मार्च या दिवशी देहलीच्या शाहीनबागमधील एक धर्मांध केरळमध्ये गेला. तेथे त्याने अलपुझा-कन्नूर एक्सप्रेसमध्ये   पेट्रोल टाकून प्रवाशांना पेटवून दिले. त्यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ९ जण गंभीर घायाळ झाले. त्यानंतर २ मासांनी समाजकंटकाने एका रिकाम्या बोगीला आग लावली. त्याच्या बाजूलाच भारत पेट्रोलीयमचे गोदाम होते. तेव्हा मोठी दुर्घटना घडण्यापासून आपण थोडक्यात वाचलो. हे ‘गझवा ए हिंद’ आहे. यालाच ‘जिहाद’ म्हणतात, असे मत संरक्षणतज्ञ आर्.एस्.एन्. सिंह यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पंचम दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले. या वेळी व्यासपिठावर पंचकुला (हरियाणा) येथील ‘विवेकानंद कार्य समिती’के अध्यक्ष श्री. नीरज अत्री,  भुवनेश्वर (ओडिशा) येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक अनिल धीर, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी,  ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल आणि मध्यप्रदेश येथील ‘हिंदु सेवा परिषदे’चे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष श्री. अतुल जेसवानी हे मान्यवर उपस्थित होते.

‘रेल्वे जिहाद आतंकवादाचे नवे रूप’ या विषयावर बोलतांना आर्.एस्.एन्. सिंह म्हणाले की, देहलीच्या शाहीनबागमध्ये केरळहून ‘पीएफ्आय’चे लोक गेले होते, तर दुसरा आरोपी अलपुझा-कन्नूर एक्सप्रेसमध्ये हत्या करण्यासाठी शाहीनबागमधून केरळला गेला होता. पोलीस चौकशीमध्ये आरोपीला स्थानिक साहाय्य मिळाल्याचे म्हटले आहे. केरळमध्ये जिहादची ‘इको सिस्टिम’ (यंत्रणा) आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबाला बंगालचा एक जिहादी पकडला गेला. बेंगळुरूमध्ये दरोडे टाकल्याप्रकरणी ४ जिहाद्यांना शिक्षा झाली. त्यांना जिहादसाठी पैसा प्राप्त करण्यासाठी सांगितले गेले होते; म्हणून त्यांनी दरोडे टाकल्याचे समोर आले. अशाच प्रकारे आणखी तिघांना शिक्षा झाली. यालाच ‘गझवा-ए-हिंद’ म्हणतात. जेव्हापासून भारतात ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ रेल्वेगाडी चालू झाली, तेव्हापासून तिच्यावर विविध ठिकाणी दगडफेक करण्यात आली. ओडिशातील बालासोर हे अतिशय संवेदनशील स्थान आहे. त्यामुळेच रेल्वे दुर्घटनेसाठी ते ठिकाण निवडण्यात आले असावे, असे वाटते. सर्व जिहाद्यांची मुळे एकमेकांशी जुळलेली असून त्यांना सीमा नाही.

जिहादच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक ! – नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

नीरज अत्री, अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती, हरियाणा

आपण त्या परंपरेतून आलो आहोत, जेथे सत्याला आदर्श मानले जाते, तर खोटे बोलण्याला अधर्म समजले जाते. शत्रूशी लढण्यासाठी हिंदूंनी स्वयंबोध म्हणजे स्वत:चा धर्म समजून घेणे आवश्यक आहे, तसेच शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी शत्रूबोधही करून घेणे म्हणजेच शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक आहे. कुराणमध्ये मुसलमानेतरांसाठी ‘काफिर’ हा शब्द वापरला आहे. काफिरांविरोधात जिहाद करण्याचा संदेशही कुराणामध्ये देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील वारी परंपरेमध्ये मुसलमानांनी घुसखोरी केली आहे. वारीमध्ये सहभागी झालेल्या मुसलमानाला विठ्ठलाचा महिमा सांगता आला असता; परंतु त्यांनी ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे’, असे सांगितले. पश्चिम बंगाल, काश्मीर, केरळ यांसारख्या मुसलमान बहुसंख्य असलेल्या ठिकाणी ते हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे प्रकार करत नाहीत. ज्या ठिकाणी ते अल्पसंख्यांक आहेत, तेथे हे असे प्रकार करून जवळीक साधण्याच्या प्रयत्न करतात. त्यामुळे हिंदूंनी प्रथम शत्रूच्या हालचाली समजून घेणे आवश्यक आहे, असे परखड उद्गार हरियाणा येथील ‘विवेकानंद कार्य समिती’चे अध्यक्ष नीरज अत्री यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

भारतातील शिक्षणाचा दर्जा उंचावणे आवश्यक ! – अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज, भुवनेश्वर, ओडिशा

अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज, भुवनेश्वर, ओडिशा

रामनाथ देवस्थान – भारतात गुरु-शिष्य परंपरा होती, तेव्हा भारत विश्वगुरु होता. त्या काळामध्ये असंख्य ग्रंथ लिहिले गेले. येथे विदेशातून मुले शिकायला येत होती आणि आता त्याच्या उलट होत आहे. भारतातील ८ लाख ८० सहस्र मुले विदेशात शिकत आहेत आणि कालांतराने ते तेथेच स्थायिक होणार आहेत. त्यामुळे भारताने शिक्षणव्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे उद्गार ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲण्ड कल्चरल हेरिटेज’चे संयोजक श्री. अनिल धीर यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या ५ व्या दिवशी (२०.६.२०२३) काढले.

ते पुढे म्हणाले,

‘‘ओडिशामध्ये ६२ जनजाती आहेत. आम्ही वनवासींकडून ३० सहस्र पोथ्या एकत्र केल्या आणि त्या सर्व ओडिशा राज्याच्या संग्रहालयामध्ये पाठवून दिल्या. त्या पोथ्यांमध्ये श्लोक वगैरे नव्हते, तर विमानांची निर्मिती कशी करावी ?, मंदिरांचे बांधकाम कसे करावे ? आदी प्रत्येक विषयावर विवरण देण्यात आले होते. यावरून काही सहस्र वर्षांपूर्वी त्यांनी किती उच्च दर्जाचे लिखाण केले होते, हे लक्षात येते. अशा आदिवासींकडे कोणतीही लिपी नाही. त्यांचे हे ज्ञान वडिलांकडून मुलाकडे हस्तांतरित होत गेले. या आदिवासी मुलांना चांगले शिक्षण मिळाले, तर भारत अधिक चांगली प्रगती करेल. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विशेष शाळा उघडण्याची आवश्यकता आहे.’’

जगन्नाथपुरी येथे २० जून या दिवशी विश्वप्रसिद्ध भगवान जगन्नाथाची रथयात्रा असतांनाही या दिवशी ओडिशातील हिंदु धर्माभिमानी श्री. अनिल धीर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये उपस्थित राहिले.

राष्ट्राच्या उत्थानासाठी योग आणि अध्यात्म यांची आवश्यकता ! – डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल, अध्यक्ष, सत्यमेव जयते

डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल, अध्यक्ष, सत्यमेव जयते

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार थांबलेला नाही. शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये योग आणि अध्यात्म यांचे शिक्षण दिल्यास भ्रष्टाचार रोखता येईल. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अध्यात्माविना भारत कमकुवत आहे. समाजामध्ये अध्यात्माचा प्रसार केल्यास राष्ट्र निर्माणाचे कार्य सुलभ होईल. शासकीय कार्यालयांमध्ये अध्यात्म, ध्यानधारणा आणि योग यांचे शिक्षण दिले असते, तर सुराज्याची संकल्पना साध्य झाली असती. ‘अध्यात्म’ ही भारताची महानता आहे. सर्व हिंदु समाज अध्यात्माचा अंगीकार करेल, तेव्हा भारत सूर्याप्रमाणे तेजस्वी होईल. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे आपले ध्येय आहे. हिंदूंनी साधना केली तरच ही संकल्पना साध्य होऊ शकेल. हिंदु राष्ट्राची स्थापना करतांना पुढील १ सहस्र वर्षांचा आराखडा निश्चित करायला हवा, असे उद्गार ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’ ! – विश्वनाथ कुलकर्णी, राज्य समन्वयक, पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार

विश्वनाथ कुलकर्णी, राज्य समन्वयक, पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार

रामनाथी – आज सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. याविषयी सर्वजण नाराज आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात. अशा सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अपप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ‘सुराज्य अभियान’ हे आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येकच गोष्टीमध्ये लागू होणार्‍या समस्यांसाठी आहे. त्यामुळे आम्ही आपल्या सर्वांना आवाहन करतो की, आपल्या परिसरात होत असलेल्या अपप्रकारांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्यायला आरंभ करा. हाही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे पूर्व उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.

हिदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत ! – अधिवक्ता अतुल जेसवानी, संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश

अधिवक्ता अतुल जेसवानी, संस्थापक आणि प्रदेशाध्यक्ष, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश

आपल्या आजूबाजूला ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना घडतात. या घटना रोखण्यासाठी हिंदूंनी खोलात जाऊन काम करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या घटना लक्षात येताच हिंदू बांधवांनी त्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांपर्यंत पोचवायला हव्यात. ‘धर्मावरील आघात होण्यापूर्वीच ते लक्षात येतील’, अशी व्यवस्था हिदूंनी निर्माण करायला हवी. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ ज्याच्यावर आपली मालकी आहे, असा भूमीचा तुकडा नव्हे, तर ‘जेथे लव्ह जिहाद, गोहत्या, बलात्कार, धर्मांतर आदी होणार नाही’, असे राष्ट्र होय. ‘हिंदु राष्ट्र स्थापन होणारच आहे’; म्हणून हिंदूंनी स्वस्थ राहून चालणार नाही. उलट हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करायला हवेत. धर्मकार्य आस्थेने करायला हवे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *