Menu Close

‘राष्ट्र-धर्म जागृति’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी द्वितिय सत्रात मान्यवरांनी केलेले उद्बोधन !

डावीकडून चेतन राजहंस, पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, ऋषी वशिष्ठ, एस्थर धनराज आणि सूत्रसंचालन करतांना श्री. कार्तिक साळुंखे

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ‘हिंदु राष्ट्र आक्षेप आणि खंडन’ या ‘ई बुक’चे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवात २१ जून या दिवशी ‘हिंदु राष्ट्र – आक्षेप आणि खंडन’ या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘ई बुक’चे छत्तीसगडमधील श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले. या वेळी व्यासपिठावर सनातनचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, देहली येथील अर्थशास्त्रज्ञ श्री. ऋषी वशिष्ठ आणि तेलंगाणा येथील भारतीय स्वाभिमान समितीच्या सल्लागार श्रीमती एस्थर धनराज या उपस्थित होत्या. हे ‘ई बुक’ विक्रीसाठी अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असणार आहे. भारतात सेक्युलरवादी ‘हिंदु राष्ट्रा’वर आक्षेप घेतात. सेक्युलरवादी हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला घटनाविरोधी म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक आक्षेपांचे खंडन या पुस्तकात आहे.

छोट्या संघटनांना एकत्र करून हिंदुत्वाचे कार्य करायला हवे ! – पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज, संचालक, श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थान, पाटेश्‍वर धाम, छत्तीसगड

विद्याधिराज सभागृह – केवळ व्यासपिठावरून घोषणा करून हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्यक्ष कार्य करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काम केल्यामुळे हिंदूंची शक्ती विभागली जाते. गावागावांत महिलांचे गट शासकीय योजनांद्वारे काम करत असतात. या महिलांच्या गटांना धर्मकार्यात सहभागी करून घ्यायला हवे. गावांमध्ये ज्याप्रमाणे स्वच्छता अभियान राबवले जाते, त्याप्रमाणे संस्कारांच्या प्रसारासाठी अभियान राबवायला हवे. अशा प्रकारे संस्कार वाहिनीच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये १५ सहस्रजण कार्यरत आहेत. ही संख्या १ लाखापर्यंत पोचवण्याचा आमचा संकल्प आहे. या सर्वांना काम करण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे, ते सर्व संस्कार वाहिनीकडून उपलब्ध करून दिले जात आहे. हे साहित्य देण्यासाठी निधीची आवश्यकता असते; मात्र संतांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यास या अडचणी येत नाहीत. राजकीय कार्याच्या बाहेर येऊन धर्मासाठी कार्य करायला हवे. आर्य चाणक्य यांनी राजकीय शक्तीचा उपयोग धर्मकार्यासाठी करून घेतला. याचा आदर्श घेऊन आम्ही धर्मकार्य करत आहोत. यापूर्वी राजकीय पक्षांनी आमचा उपयोग करून घेतला. आता मात्र राजकीय शक्तीचा आम्ही धर्मकार्यासाठी उपयोग करून घेत आहोत. ख्रिस्ती मिशनरी प्रलोभन दाखवून गरीब हिंदूंचे धर्मांतर करतात; मात्र आम्ही हिंदूंना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे छत्तीसगड येथील धर्मांतर रोखता आले. जे धर्मांतरित झाले त्यांना दूर न लोटता त्यांना प्रेमाने जवळ करायला हवे. असे केल्यास हिंदूंचे धर्मांतर होणार नाही. प्रभु श्रीराम यांनी वनवासाच्या काळात वानरांसह वनवासींना प्रेम देऊन आपल्या कार्यात जोडून घेतले. प्रभु श्रीरामांचा आदर्श घेऊन आपणाला कार्य करायचे आहे, असे वक्तव्य वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी छत्तीसगडमधील श्री जामडी पाटेश्‍वरधाम सेवा संस्थानचे संचालक पू. रामबालक दासजी महात्यागी महाराज यांनी केले.

भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेऊन त्याविरोधात लढा दिला पाहिजे ! – ऋषी वशिष्ठ, अर्थशास्त्रज्ञ, देहली

ऋषी वशिष्ठ, अर्थशास्त्रज्ञ, देहली

रामनाथ (फोंडा) – भारतातील इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. काश्मीरमधील केसरची शेती, हिमाचल प्रदेशमधील सफरचंदाची शेती, राजस्थानमधील खाण उद्योग, उत्तरप्रदेशमधील पान मसाला उद्योग, गुजरातमधील तेल उद्योग, कर्नाटकातील चंदनाची शेती, केरळमधील नारळाची शेती आदी रोखीची अर्थव्यवस्था संपूर्णतः मुसलमानांकडे आहे. हा केवळ योगायोग नसून सनातन हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर केला जाणारा ‘प्रयोग’ (षड्यंत्र) आहे. त्यामुळे भारतातील ही इस्लामी अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे, हिंदूंना समजावून सांगितली पाहिजे आणि त्याविरोधात लढा दिला पाहिजे, असे आवाहन देहली येथील अर्थशास्त्रज्ञ ऋषी वशिष्ठ यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी केले.

ते पुढे म्हणाले की,

१. कुठल्याही प्रकारची मोहीम राबवण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी धनाची आवश्यकता असते. धनाच्या माध्यमातून संघर्ष चालू केला जाऊ शकतो, त्याला पाठिंबा दिला जाऊ शकतो. हिंदूंनी ‘डिजिटल’ अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून ती उभारली पाहिजे.

२. भारतातील मोठ्या २-३ मंदिरांची अर्थव्यवस्था ही भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा अधिक आहे. ९५ टक्के हिंदू मंदिरांमध्ये दान करतात. त्यांना या संघर्षात सहभागी करून घेता येऊ शकते. त्यांना संघटित करून राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जिल्हास्तरीय न्यासाची स्थापना करून अशा हिंदूंना एका समान सूत्रात संघटित केल्यास इस्लामी षड्यंत्र रोखता येऊ शकते.

३. भारतातील मुसलमानांची संख्या वाढली असल्याचे सांगितले जाते. एखाद्या गावातील लोकसंख्या गणनेसाठी सरकारी अधिकारी जातात, तेव्हा एका घरी, एका मुसलमान पुरुषाच्या ३ बायका, १० मुले दाखवली जातात. दुसर्‍या घरी गेल्यावर तेच लोक कुटुंबात दाखवले जातात आणि त्या संख्येच्या आधारावर सरकारकडून अनुदान, अन्नधान्य घेतले जाते. तेच धान्य त्या गावातील हिंदूंना मुसलमानांनाकडून अधिक दराने विकले जाते. हेही अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील एक षड्यंत्र आहे.

४. भारतात जेवढ्या ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्थळे (विवाह जुळवणारी संकेतस्थळे) आहेत, त्यांची ८० टक्के मालकी इस्लामी देशांकडे आहे. यामाध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतःची ‘मॅट्रिमोनियल’ संकेतस्थळे चालू करायला हवीत.

५. आर्य चाणाक्य यांनी अर्थव्यवस्थेविषयी ३ सूत्रे सांगितली – भाव, स्वभाव आणि अभाव. भाव म्हणजे जन्माने आपण हिंदु आहोत, स्वभाव म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने आपण सनातनी हिंदु आहोत; परंतु आपल्यात अभाव आहे, तो स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा. भारतीय चलनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचे चित्र असायला हवे, तेथे म. गांधी यांचे चित्र आहे, हाच अभाव आहे.

ख्रिस्ती धर्म प्राचीन असल्याचा खोटा प्रचार करून ख्रित्यांकडून  भारतात धर्मातर ! – एस्थर धनराज, सल्लागार, भारतीय स्वाभिमान समिती, तेलंगाणा

रामनाथ (फोंडा) – येशू ख्रिस्ताच्या काळात त्याचा शिष्य भारतात येऊन त्याने भारतामध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार केला, असा खोटा प्रचार ख्रिस्तांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात १६ व्या शतकापर्यंत भारतात ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. ख्रिस्ती धर्मामध्ये सर्वाधिक अंधश्रद्धा आहे. विदेशात मोठ्या विद्यापिठांची स्थापना झाल्यानंतर पहिली १०० वर्षे तेथे ख्रिस्ती धर्माचे शिक्षण दिले गेले. त्यानंतर विद्यापिठांमध्ये अर्थशास्त्र, गणित आदी विविध विषय शिकवण्यात येत आहेत. याउलट भारताच्या विद्यापिठांमध्ये धर्माचे शिक्षण दिले जात नाही. ख्रिस्ती धर्मप्रचारक राष्ट्रविरोधी प्रचार करत आहेत. ‘जोपर्यंत भारतातील भूभाग ख्रिस्त्यांसाठी देत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून हिंदूंचे धर्मातर चालू राहील’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनर्‍यांचा प्रचार चालू आहे. असे असूनही ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कोणतीही कारवाई होत नाही. ख्रिस्ती धर्मप्रचारकांना प्रचार करण्यापूर्वी हिंदु धर्माविषयी शिक्षण देऊन शत्रूभेद शिकवला जातो. सर्व हिंदूंनी ख्रिस्त्यांच्या प्रचाराचे तंत्र समजून घ्यायला हवे. हिंदूंनी याचा अभ्यास करून घेणे आवश्यक आहे. हिंदूंनी याचा अभ्यास केला, तरच ते ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रतिवाद करू शकतील, असे वक्तव्य तेलंगाणातील भारतीय स्वाभिमान समितीच्या सल्लागार एस्थर धनराज यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीच्या सत्रात केले.

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडलेल्या मुलींना सोडवण्यासाठी दक्षता समित्यांची स्थापना करणे आवश्यक ! – अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ, गोवा.

अधिवक्ता शैलेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ, गोवा.

रामनाथी – देशात लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात  घडत आहेत. यासाठी धर्मांध तरुण हिंदु असल्याचे सांगून हिंदु मुलींशी परिचय वाढवतात. त्यानंतर एक दिवस तिच्याशी लग्न करतात. त्या मुलीवर आधीच वशीकरण केलेले असल्याने ती त्याला सोडून जात नाही आणि तो सांगेल, त्याप्रमाणे वागायला लागते. तिने तसे न केल्यास तिला पुष्कळ मारहाण केली जाते. एक दिवस तिचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा प्रकारे ‘लव्ह जिहाद’ मध्ये अडकलेल्या मुलींना सोडवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दक्षता समिती स्थापन केल्या पाहिजेत, असे मत गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचे अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) व्यक्त केले.

या वेळी अधिवक्ता शैलेश कुलकर्णी यांनी लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडलेल्या गोवा येथील एका हिंदु मुलीची कशी सुटका केली, याचा स्वानुभव कथन केला. त्यांनी सांगितले, ‘‘गोवा येथील एक हिंदु मुलगी पुणे येथे नोकरीनिमित्त असतांना एका धर्मांध तरुणाने हिंदु बनून तिच्याशी परिचय वाढवला आणि नंतर तिच्याशी लग्न केले. त्यानंतर मुसलमान बनण्यासाठी तिच्यावर दबाव निर्माण केला. त्यासाठी तिला पुष्कळ मारहाण केली. नंतर तिने हिजाब, बुरखा आणि काळे कपडे परिधान करणे चालू केले. धर्मांधाने तिला ‘धर्मांतर केले नाही, तर तुला मारून टाकेन’, अशी धमकीही दिली. तिने ती संकटात असल्याविषयी मैत्रिणीच्या माध्यमातून वडिलांना संदेश (मॅसेज) पाठवला. अर्थात तिच्या वडिलांनी हे प्रकरण मला दिले. त्यानंतर मी तिच्या वडिलांसह कोथरुडला गेलो. पीडितेच्या घरी जाण्यापूर्वी पुणे येथील बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांना कळवले. या कामासाठी त्यांनी २५० कार्यकर्ते साहाय्याला दिले. यासमवेतच पुणे पोलिसांना कळवले असल्याने तेही समवेत होते. प्रारंभी मुलीने आमच्या समवेत येण्यास नकार दिला; पण नंतर तिला घेऊन आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात गेलो. तेथे तिला विश्वासात घेतले. तेव्हा तिने पोलिसांना सर्व माहिती दिली. मुलीने लिहून देतांना ‘ती त्याच्यासमवेत स्वत:हून गेली’, असे सांगितले आणि त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार करण्यास नकार दिला. यावरून ‘द केरला स्टोरी’ आपल्या घरापर्यंत पोहोचली आहे’, असे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी ‘पापा, प्लिज हेल्प मी’ (बाबा, मला मदत करा) अशीही चळवळ राबवू शकतो.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *