Menu Close

‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ या विषयावर ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या सातव्या दिवशी मान्यवरांनी केलेले उद्बोधन

निवडणुकीमध्ये लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्यांची जातपात न पाहता निवडून देणे आवश्यक ! – मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा, नवी देहली

मुन्ना कुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदू महासभा, नवी देहली

रामनाथी (फोंडा) – जोपर्यंत या देशात हिंदु बहुसंख्य रहातील, तोपर्यंत हा देश सुरक्षित राहील. हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचेही तुकडे होतील. जेथे मुसलमान बहसंख्य झाले, तेथे हिंदूंना पलायन करावे लागत आहे. त्यामुळे हिंदू सुरक्षित राहिले, तर भारतासह विश्‍वही सुरक्षित राहील. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेमध्ये ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) हा शब्द अंतर्भूत केला. तेव्हापासून या देशात हिंदु धर्माला शिव्या घालणार्‍यांना ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘सुशिक्षित’ म्हटले जाते, तर हिंदूंच्या रक्षणार्थ लढणार्‍यांना ‘भगवा आतंकवादी’ म्हटले जाते. येत्या निवडणुकीमध्ये  लव्ह जिहाद, गोहत्याबंदी यांसाठी कार्य करणार्‍या उमेदवारांना त्याची जातपात न पाहता निवडून दिले पाहिजे. एक दिवस या देशात हिंदु राष्ट्र येईल, तेव्हा आपले राष्ट्र जगभरात बलवान होईल. त्यामुळे आपल्याला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या साहाय्याने भारताला हिंदु राष्ट्र करण्यासह संपूर्ण विश्‍वाला हिंदुमय करायचे आहे, असे वक्तव्य नवी देहली येथील अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा यांनी वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या वेळी केले.

भारताची ८५ टक्के लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हे हिंदूंचे राष्ट्र आहे. तरीही या देशात गोमाता आणि हिंदु महिला सुरक्षित नाहीत. पूर्वी देशात हिंदु राजांची निरनिराळी संस्थाने होती, तरीही ते हिंदु राष्ट्र होते. जेव्हा या देशावर परकीय मुसलमान आक्रमकांचे शासन आले, तेव्हापासून हिंदूंवर अत्याचार चालू झाले. त्यानंतर इंग्रजांनीही तेच केले. जेव्हा हिंदु राजा आणि संस्थानिक यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला, तेव्हा इंग्रजांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला.

लव्ह जिहाद, लँड जिहाद, गोहत्या, धर्मांतर अशा विविध क्षेत्रात काम करणार्‍या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभर कार्यरत आहेत. अशा संघटनांना एका व्यासपिठावर आणून त्यांना विविधत प्रशिक्षण देणाचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. अशी समिती आणि त्यांचे प्रेरणास्थान परमपूज्य डॉ. जयंत आठवले यांना सादर नमन आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुहिताच्या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’मुळे वैचारिक बळ मिळते ! – संदीप शिंदे, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह

संदीप शिंदे, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह

रामनाथी –  दैनिक ‘सनातन प्रभात’ने या वर्षी रौप्यमहोत्सवी अर्थात २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुहिताच्या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’मुळे वैचारिक बळ मिळते. विविध हिंदु सणांच्या विरोधात नास्तिकतावाद्यांकडून धर्मद्रोही आवाहने केली जातात. त्या विरोधात ‘सनातन प्रभात’ केवळ वृत्त छापून थांबत नाही, तर त्यामागील धर्मशास्त्रीय दृष्टीकोनही छापते. परिणामी हिंदूंना धर्मशास्त्रीय भूमिका समजते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी प्रारंभीपासूनच सनातनच्या साधकांना शिकवले की, ‘सनातनचा प्रत्येक साधक पत्रकार आहे.’ त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करणारा हिंदु राष्ट्रवीरही ‘सनातन प्रभात’चा पत्रकार आहे’, असे आम्ही समजतो. देशात आणि जगात जेथे जेथे हिंदूंवर अन्याय होईल, आघात होतील, आक्रमणे होईल, अत्याचार होईल, त्यांचा ‘सनातन प्रभात’ आवाज बनेल. त्यांच्यावरील अत्याचारांना वाचा फोडेल, असे आश्वासक उद्गार ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे सहसंपादक श्री. संदीप शिंदे यांनी काढले. ते १६ ते २२ जून या कालावधीत येथे पार पडलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात उपस्थितांना संबोधित करत होते.

सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन होणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

रामनाथी – नवीन संघटनेची स्थापन केली जाते, तेव्हा त्यांनी ध्येयही ठरवणे आवश्यक आहे. ध्येय ठरवल्यानेच संघटनेच्या कार्याला दिशा आणि गती मिळते. त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेने ध्येय ठरवून कार्य करणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित आणि महात्मा यांनी सर्वधर्मसमभावाचे नॅरेटिव्ह (कथानक) भारतियांवर थोपवले. त्याने संपूर्ण हिंदु धर्माला घेरले. सनातन धर्माची ज्ञान परंपरा (ब्राह्मतेज) आणि शौर्य परंपरा (क्षात्रतेज) यांचे पालन झाले पाहिजे. भारताकडे असलेल्या ज्ञानपरंपरेकडे पाहून संपूर्ण जग भारताकडे आकर्षित होत आहे. हिंदूंचे शास्त्र आणि विज्ञान परिपूर्ण आहे. त्यामुळे हिंदु धर्मसिद्धांत केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सप्तम दिनी उपस्थितांना संबोधित करत होते.

गोरक्षकांवरील आक्रमणाचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात निषेध !

नांदेड येथे १९ जूनच्या रात्री चारचाकी वाहनातून जाणार्‍या गोरक्षकांवर एका टोळीने प्राणघातक आक्रमण केले. या आक्रमणात एका गोरक्षकाचा मृत्यू झाला असून ४ गोरक्षक गंभीररित्या घायाळ झाले आहेत. गोरक्षकांवर आक्रमण करणार्‍यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत २२ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गोरक्षकांवरील आक्रमणाचा निषेध करण्यात आला. महोत्सवात एकमताने हा ठराव संमत करण्यात आला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *