भिलवाडा (राजस्थान) – भारतीय संस्कृती पूर्णपणे वैज्ञानिक आहे. ‘पाश्चात्त्य संस्कृती आधुनिक आहे आणि हिंदु संस्कृती मागासलेली’, ही न्यूनगंडाची भावना आपण आता सोडली पाहिजे; कारण आज पाश्चात्त्य देश हिंदु संस्कृतीतील वैज्ञानिकतेमुळे आपल्याकडे आकर्षित होत आहेत. आपले खाणे-पिणे, पोषाख, सण, परंपरा या सर्वांचे विदेशामध्ये अधिक आकर्षण आहे. अशा स्थितीत आपली संस्कृती जाणून घेऊन त्यानुसार आचरण करणे आणि ही संस्कृती वृद्धींगत करणारे आपले धर्मशास्त्र, आई-वडील, आजी-आजोबा, शिक्षक यांचा सन्मान करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथील ‘माहेश्वरी पब्लिक स्कूल’मध्ये ‘भारतीय संस्कृतीची वैज्ञानिकता आणि तणावमुक्ती’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर शाळेच्या व्यवस्थापिका रूची रस्तोगी, राखी मोदी आणि गायत्री जागेटिया या उपस्थित होत्या.
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2023/07/Anand_Jakhotia_Hasara_June2018.jpg)
श्री. जाखोटिया पुढे म्हणाले,
‘‘आपल्यातील दुर्गुण नष्ट केल्याविना आपण यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या जीवनात प्रतिदिन येणारा ताण आपल्या दुर्गुणांचा परिणाम आहे. यासाठी स्वतःमधील दुर्गुण नष्ट करण्यासाठी आपल्याला सद़्गुणांचा विकास केला पाहिजे. यामुळे आपले जीवन यशस्वी होईल.’’
![](https://www.hindujagruti.org/marathi/wp-content/uploads/sites/9/2023/07/Hjs_Upsthit_Vidyarthhni_C.jpg)
शाळेचे विश्वस्त श्री. राजेंद्र कचोलिया आणि प्राचार्या अल्पा जैन यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. आनंद जाखोटिया आणि इतर कार्यकर्ते यांचे टिळा लावून स्वागत करण्यात आले.