Menu Close

प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे, तर अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

अधिवक्ता सतीश देशपांडे

कत्तलखाने आणि कारखाने यांमुळे प्रदूषण होते, हे गोदावरी, यमुना आदी अनेक नद्यांविषयी सरकारनेच दिलेल्या अहवालांतून स्पष्ट झाले आहे; मात्र गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते, याची अधिकृत माहिती, आकडेवारी सुद्धा कोणाकडे नाही. मग गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होते, हे कोणत्या आधारावर म्हटले जात आहे ? गणेशोत्सवच नव्हे, तर हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांवर विविध बंधने आणायचे षड्यंत्र आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी याविषयी आवाज उठवला पाहिजे आणि जागृती केली पाहिजे, असे आवाहन इतिहास आणि संस्कृती अभ्यासक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होते का?’ या विषयावरील विशेष संवादात ते बोलत होेते.

या वेळी कोल्हापूर येथील ‘हिंदू एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई म्हणाले की, वहात्या पाण्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केले पाहिजे अशी हिंदू धर्मात परंपरा आहे; मात्र आज वाहत्या पाण्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास पोलीस-प्रशासनाकड़ून विरोध केला जातो आणि हे कुठल्या आधारे केले जाते. तसेच न्यायालयाच्या कोणत्या आदेशानुसार केले जाते, याविषयी पोलीस-प्रशासनाकडे नीट उत्तर नाही. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीमध्ये 6 ते 7 नाल्यांचे आणि कारखान्यांचे पाणी सोडले, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही; मात्र गणेशोत्सव आला की, हे प्रदूषणाच्या नावाखाली जागे होतात. हिंदूंच्या प्रथा-परंपरा बंद करण्यासाठी हे सर्व केले जात आहे, असे यातून दिसते.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर म्हणाले की, गणेशोत्सवात प्रदूषण होते, असा भ्रम नागरिकांमध्ये तथाकथित पर्यावरणवादी, विज्ञानवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले निर्माण करत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च 2023 मध्ये जाहीर केलेल्या पुस्तिकेत सर्वांत हानीकारक प्रदूषित नद्यांमध्ये मुंबईतील मिठी नदी, नागपूरमधील कन्हान नदी, पुण्यातील मुळा-मुठा नद्या यांचा उल्लेख केला होता. मार्चमध्ये तर गणेशोत्सव नव्हता, तर मग हे कोणते प्रदूषण होते ? कारखाने, कत्तलखाने यांच्यामुळे वर्षभर होणारे प्रदूषण त्याविषयी आवाज न उठवणारे विज्ञानवादी, सेलिब्रिटी मात्र गणेशोत्सवात प्रदूषण होते, याविषयी बोलतांना दिसतात. कारखाने आणि कत्तलखाने यांच्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी यांनी काही केले आहे का ? गेली 10-12 वर्ष कृत्रिम तलाव बनवल्यावर प्रदूषण कमी झाले आहे, असे सरकार आकडेवारीसह जाहीर करेल का ? हिंदूंचा गणेशोत्सव आणि अन्य सण प्रदूषण निर्माण करत नाहीत, उलट जीवनात ज्ञान आणि आनंद यांची वृद्धी करतात. गणेशोत्सव आणि हिंदूंच्या सण-उत्सवांत प्रदूषण होते, या भ्रमातून हिंदूंनी बाहेर येऊन आपले सण-उत्सव साजरे करावेत, असेही श्री. कोचरेकर यांनी शेवटी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *