Menu Close

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संमेलन’ !

मंदिरांमध्ये आदर्श वस्त्रसंहिता लागू करून मंदिरांचे पावित्र्य जपणे आवश्यक – प्रशांत तुपे, सचिव, पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्ट, सातारा

दीपप्रज्वलन करतांना उपस्थित मान्यवर

सातारा – महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. त्यामुळे मंदिरातील पावित्र्य, वस्त्रसंहिता, देणग्या आदींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. मंदिरे ही हिंदूंसाठी ऊर्जेची आणि चैतन्याची केंद्रे आहेत. येथील अपहार थांबवण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अत्यंत तळमळीने प्रयत्न चालू आहेत. यामध्ये आम्हीही सक्रीय सहभागी झालो आहोत. सातारा जिल्ह्यात ३ सहस्र ७१६ महसुली गावे असून प्रत्येक गावात एकतरी मोठे मंदिर आहे. भविष्यात या मंदिरांशी समन्वय साधून त्यांनाही आदर्श वस्त्रसंहिता लागू करण्याची विनंती करून मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे वक्तव्य पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्टचे सचिव श्री. प्रशांत तुपे यांनी केले. येथील श्री नटराज मंदिराच्या सभागृहामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र संमेलना’त ते बोलत होते. या वेळी हिंदु राष्ट्राची आवश्यकता, वक्फ बोर्ड, लँड (भूमी) जिहाद, भारताचे तुकडे करण्याचे षड्यंत्र, खोटी कथानके, आपत्काळाची भीषणता, भारतीय मंदिरांचे महत्त्व, मंदिरांचे पावित्र्य जपणे, मंदिरांसाठी आदर्श वस्त्रसंहिता आदी विषयांवर मान्यवरांनी विस्तृत मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील अनेक धर्माभिमानी हिंदूंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

संमेलनाच्या प्रारंभी ‘महंत आबानंदगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट’चे संस्थापक अध्यक्ष पू. राजेंद्र पांचाळ, पू. (सौ.) कविता पांचाळ, दैनिक ‘सांजवात’चे वृत्त संपादक श्री. माधव जाधव, हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. बाळकृष्ण निकम यांनी शंखनाद केला. हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘हिंदु राष्ट्र संमेलना’साठीचा संदेश वाचन करण्यात आले.  यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

भारतीय सैन्य आणि रेल्वे नंतर सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाकडे ! – विशाल देशपांडे, सातारा जिल्हा प्रचारसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

इस्लामच्या कोणत्याही धर्मग्रंथामध्ये ‘वक्फ’ हा शब्द आलेला नाही; मात्र इस्लामध्ये ‘वक्फ’ या शब्दाचा अर्थ ‘अल्लासाठी दान करणे’, हा शब्द प्रचलित करण्यात आला आहे. वर्ष १९१३ मध्ये वक्फ कायदा निर्माण झाला. वर्ष १९५४ मध्ये फाळणीनंतर यावर प्रकर्षाने कार्यवाही करण्यात आली. भारत सोडून पाकिस्तानमध्ये निघून गेलेल्या सर्व मुसलमानांच्या स्थावर मालमत्ता वक्फ बोर्डाने कह्यात घेतल्या. पुढे वेळोवेळी वर्ष १९९५ आणि वर्ष २०१३ मध्ये वक्फ कायद्यामध्ये पालट करण्यात आले. ३२ हून अधिक संघटनांचे मिळून वक्फ बोर्ड निर्माण झाले आहे. त्यामुळे भारतीय सैन्य आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाकडे आहे.

‘भूमी जिहाद’च्या माध्यमातून भूमी बळकावण्याचा प्रयत्न ! – अजय पावसकर, सातारा जिल्हा संघटक, हिंदु एकता आंदोलन

कराड येथील श्री उत्तरालक्ष्मीदेवीची पुष्कळ मोठी भूमी वक्फ बोर्डाने बळकावली आहे. शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना हाताशी धरून संगनमताने हे षड्यंत्र रचण्यात आले आहे. आपण कागदपत्रांचा शोध घेत आहोत; मात्र आपल्याला कोणत्याही नोंदी आढळून येत नाहीत, अशी स्थिती आहे. श्री उत्तरालक्ष्मीदेवीची जागा ही गायरान जागा आहे. आपण याविषयी जेव्हा लढा चालू केला, तेव्हा आपल्यावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकण्यात आला; मात्र कोणत्याही दबावाला न जुमानता आपण आपला लढा पुढे कायम ठेवला. लव्ह जिहाद, लँड जिहाद आदींविषयी मुसलमानांचे संघटित कार्य (टीम वर्क) दिसून येते; मात्र याउलट हिंदु असंघटीत असल्याने भूमी बळकावल्यानंतर त्यांना माहिती होते. ‘भूमी जिहाद’च्या माध्यमातून वक्फ बोर्डाकडून हिंदूंना अंधारात ठेऊन भूमी बळकावण्याचा प्रयत्न चालू आहे.

हिंदूंचा दबावगट निर्माण करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ आवश्यक ! – प्रा. सौ. भक्ती डाफळे
हिंदु धर्माचा अभ्यास नसणारे पुरोगामी, साम्यवादी वगैरे एकत्र येत आहेत. सरकारवर दबावतंत्राचा उपयोग करून ते त्यांचे म्हणणे खरे करून घेत आहेत. यासाठी हिंदूंचाही दबावगट कार्यरत असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवर ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना करणे आवश्यक आहे. या माध्यमातून आपण ‘हिदु दबावगट’ निर्माण करू शकतो.

विशेष

हिंदु जनजागृती समितीचे राजन बुणगे, कु. क्रांती पेठकर, सौ. रूपा महाडिक, सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम यांच्या काही धर्माभिमान्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ची स्थापना करण्यात आली, तसेच या समितीची बैठक प्रत्येक मासाच्या पहिल्या रविवारी घेण्याचे निश्चित करण्यात आले. देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्मसभा घेण्याचे ठरले. या संमेलनाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाली.

वंदनीय उपस्थिती

लिंब-गोवे येथील वाराणसी अटल आखाड्याचे पू. योगेंद्रगिरी महाराज, वाराणसी येथील पुरोहित आचार्य अमरिष शुल्काजी, श्री समर्थ पंचायतमधील वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठपती ह.भ.प. विठ्ठल स्वामी वडगावकर

हिंदु राष्ट्र संमेलनासाठी सहकार्य केलेले धर्माभिमानी

१. धर्मप्रेमी श्री. अजय कदम यांनी कार्यक्रमस्थळी विद्युत् आणि व्यासपीठ यांची व्यवस्था उपलब्ध करून दिली.

२. धर्माभिमानी श्री. ओंकार डोंगरे यांनी उपस्थितांना अल्पाहार उपलब्ध करून दिला.

३. श्री नटराज मंदिर व्यवस्थापनाने अत्यल्प दरात मंदिराचे सभागृह उपलब्ध करून दिले.

४. वेदभवन मंगल कार्यालयाचे मालक श्री. दिनेश पाठकगुरुजी यांनी कार्यक्रमासाठी खुर्च्या आणि सतरंजा उपलब्ध करून दिल्या.

५. धर्मप्रेमी श्री. किशोर घाडगे यांनी कार्यक्रमाच्या साहित्य ने-आण करण्यासाठी स्वत:चे चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले.

संदर्भ : सनातन प्रभात मराठी

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *