Menu Close

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन !

देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी !

कोल्हापूर (महाराष्ट्र) – केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानध्ये प्रशासक नेमणे ही मंदिर सरकारीकरणाची पहिली पायरी असून याला भाविकांचा तीव्र विरोध आहे. प्रशासक नेमल्यावरही भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. तरी जे विश्वस्त दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे किंबहुना देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची ‘सी.आय.डी.’ चौकशी झाली पाहिजे. दोषींना शिक्षा होईपर्यंत हा लढा चालूच ठेवून संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली. ‘सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती’ आणि ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ यांच्या आज क्रांती ज्योती चौक, गारगोटी, कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक आंदोलन’ करण्यात आले. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर बाळूमामांच्या प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात हे देवस्थान द्यावे, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्रीमती अश्विनी वरुटे यांना देण्यात आले.

या आंदोलनात बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज, मुळेमामा देवस्थान भक्त मंडळ, मुळेमामा देवस्थानचे विश्वस्त, उजळाईवाडी येथील संत बाळूमामा देवस्थानचे सदस्य, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजप, यांसह विविध संघटना यांसह 150 हून अधिक भाविक सहभागी झाले होते. कृती समितीचे समन्वयक श्री. बाबासाहेब भोपळे यांनी देवस्थानात झालेला भ्रष्टाचार या संदर्भात, तसेच उभारण्यात आलेला लढा या विषयी माहिती दिली. या प्रसंगी ‘‘नाही होऊ देणार, नाही होऊ देणार बाळूमामा देवस्थानचे सरकारीकरण, नाही होऊ देणार’’, ‘‘मशिद आणि मदरसा यांच्यासाठी वक्फ बोर्ड, चर्चसाठी डायोसेशन सोसायटी, तर मग बाळूमामांच्या मंदिराचेच सरकारीकरण का?’’, ‘‘बाळूमामांच्या भक्तांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे’’, ‘‘नको शासक, नको प्रशासक, भक्तांना हवेत बाळूमामांचे प्रामाणिक सेवक !’’ यांसह देण्यात आलेल्या अन्य घोषणांनी क्रांती ज्योति चौक दणाणून गेला.

उपस्थित मान्यवर – सकल मराठा समाजाचे गारगोटी तालुका समन्वयक श्री. तुकाराम देसाई, अध्यक्ष श्री. नंदू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन देसाई, मनसे तालुकाप्रमुख श्री. अशोक पाटील, कागल तालुका महिला अध्यक्ष सौ. सीमा गोरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे, मुळे महाराज देवस्थानचे पुजारी श्री. गंगाराम चव्हाण, अखिल भारतीय हिंदु खाटिक समाजाचे अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे, माचुर्लीकर, सद्गुरु मुळे महाराज देवस्थानचे श्री. नामदेव शिंदे, सर्वश्री सुजित माळी, आप्पासाहेब कुराडे, सदा बेळगावकर, संत बाळूमामा यांची प्रत्यक्ष सेवा केलेल्या भक्त चंदूलाल शहा-शेठजी यांचे पणतू परेश शहा-शेठजी उपस्थित होते.

मान्यवरांचे मनोगत

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांचा दानपेटी घोटाळा करणार्‍या भ्रष्टाचार्‍यांना सरकार अद्याप शिक्षा देऊ शकलेले नाही. या घोटाळ्यानंतर नुकतेच पुन्हा एकदा श्री भवानीदेवाचे प्राचीन दागिने गायब होणे, चांदीचा मुकुट गायब होणे यांसह अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. श्री विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होऊन 38 वर्षे झाले तरी 314 हून अधिक प्राचीन जडजवाहिरात आणि दागिन्यांचे मुल्यांकन अन् नोंदी झालेल्या नाहीत. तेथे प्रसादाचे लाडू, शौचालय, भक्तनिवास, ग्रंथालय आदी सर्वात घोटाळे झाले आहेत. अशा स्थितीत भविष्यात संत बाळूमामा देवस्थानाचे सरकारीकरण झाल्यावर येथेही अशाच प्रकारे अनागोंदी कारभार होणार नाही, याची हमी कोण देणार?

त्यामुळे संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यासाठी संत बाळूमामांनी आपल्याला माध्यम म्हणून निवडले आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे आणि या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. याचसमवेत देवस्थानातील भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार रोखण्यासाठी हे आंदोलन करणे म्हणजे बदनामी करणे नव्हे, हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांसाठी ‘सी.आय.डी.’ चौकशी झालीच पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम असून त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू. देशातील सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होईपर्यंत आमचा लढा चालूच राहील.

बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्थेचे अध्यक्ष श्री. निखिल मोहिते म्हणाले, ‘‘या आंदोलनातून भ्रष्टाचार करणार्‍यांच्या गोष्टी झाकून जाणार नाहीत, हे विरोधकांना समजले असेल. आज आंदोलनाचा प्रारंभ झाला असून यापुढील काळात संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रत्येक गावात ठिणगी पडेल, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.’’ श्री. सुनील सामंत म्हणाले, ‘‘देवस्थानातील भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक वेळा विविध प्रसारमाध्यमांमधून वृत्त येऊनही दैनिकांतून वृत्ते येऊनही दोषींवर कारवाई झालेली नाही. भ्रष्टाचार करणार्‍या म्हणजे सेक्युलर विचारसरणी आणि नास्तिकवादी लोकांच्या हातात देवस्थान न जाण्यासाठी प्रयत्न करणे हे हिंदूंचे कर्तव्य आहे.’’  मुळेमामा भक्त मंडळाचे एस्.के. पाटील म्हणाले, ‘‘देवस्थानाचे सरकारीकरण करण्याला आमचा तीव्र विरोध असून आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.’’ या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे म्हणाले, ‘‘संत बाळूमामा आमचे दैवत असून भाविकांनी अर्पण केलेल्या ज्या धनाचा अपहार झाला आहे त्यातील ‘पैन अन पै’ वसूल होईपर्यंत हे आंदोलन चालू राहील.’’

या वेळी करण्यात आलेल्या अन्य काही मागण्या

1. राज्यभरातून येणार्‍या भाविकांना वाहनतळ, स्वच्छतागृह, पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य, तसेच अन्य सुविधा पुरेशा प्रमाणात मिळाव्यात. जे भाविक पुष्कळ लांबून येतात, त्यांच्यासाठी चांगला भक्तनिवास उभारावा.

2. मुरगुड ते मुदाळतिट्टा या मार्गावर येणार्‍या भाविकांना नि:शुल्क सुलभ शौचालय आणि स्नानगृह उपलब्ध करून द्यावे.

3. बग्याचे व्यवस्थापन, बकर्‍यांच्या आरोग्याची होणारी हेळसांड/आजारी आणि नरबकरी यांची विक्री याकडे प्रशासकांनी विशेष लक्ष द्यावे, तसेच कारभारी यांची वेतनवाढ व्हावी.

4. आजपर्यंत ज्या ज्या भक्तांनी दान म्हणून संत बाळूमामा देवस्थानला जमिनी दिल्या आहेत, त्या सर्व नोंदी अधिकृतरित्या करून, त्या जमीनीचा खंड सध्याच्या बाजारभावाप्रमाणे योग्य प्रमाणात घेऊन त्या धनाचा उपयोग धर्मकार्यासाठी करण्यात यावा.

5. उत्सव काळात भाविकांची आंबील व्यवस्था आणि अन्नछत्र यांची होणारी गैरसोय थांबवावी. अन्नछत्र रात्री 9 पर्यंत न थांबवता ते अखंडपणे चालू रहावे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *