Menu Close

ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर, ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासह जिल्ह्यात ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !

वस्त्रसंहितेसह संपूर्ण महाराष्ट्रातील ५२८ हून अधिक मंदिरांमध्ये मंदिरांचे पावित्र्य जपले जाणार ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघ

पुणे येथील पत्रकार परिषदेत (डावीकडून) श्री. सागर तुपे, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. सुनील घनवट, श्री नंदकुमार अनगळ, श्रीमती संगिता (ताई) ठकार, अधीवक्ता मंगेश जेजुरीकर आणि श्री. पराग गोखले

पुणे (महाराष्ट्र) : मंदिरांचे पावित्र्य जपणे आणि आपल्या महान भारतीय संस्कृती प्रसार होण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर यांसह ७१ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील सुमारे ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुणे येथील ‘श्रमिक पत्रकार भवन’, गांजवे चौक येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या पत्रकार परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे पुणे जिल्हा निमंत्रक ह.भ.प. चोरघे महाराज, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराच्या विश्वस्त श्रीमती संगिताताई ठकार, कऱ्हे पठार खंडोबा मंदिर देवस्थानचे विश्वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर, श्रीचतुःश्रृंगी देवस्थानचे श्री. नंदकुमार अनगळ, हडपसर येथील श्री तुकाई देवस्थानचे सचिव श्री. सागर तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले की, पुण्याप्रमाणे यापूर्वीच नागपूर, अमरावती, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, यांसारख्या अनेक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये ही वस्रसंहिता लागू करण्यात आलेली आहे. मंदिर महासंघाच्या प्रयत्नांचे स्वागत होत असून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये आणि विदेशातील मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता लागू करण्याचा स्तुत्य निर्णय तेथील विश्वस्तांकडून उस्फूर्तपणे घेतला जात आहेत.

वर्ष २०२० मध्ये निधर्मी शासनानेही राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे. देशभरातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी अस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहितेचे काटेकोर पालन होते. याच धर्तीवर हिंदूंच्या मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील ७१ मंदिरांच्या विश्‍वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्री. घनवट यांनी सांगितले.

श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’मध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची स्थापना करण्यात आल्यानंतर महासंघाचे कार्य राज्यभरात उत्तरोत्तर वाढतच आहे. श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला; मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात ५२८ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी हे कसे चुकीचे आहे यासाठी टाहो फोडतात. समाजात भारतीय संस्कृतीविषयी चुकीचे विचार पसरवतात; परंतु मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. मंदिर विश्वतांनी या सर्वांचा अतिशय चांगला विचार केला आणि हा निर्णय घेतला. त्यामुळे येथून पुढे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील आणि संस्कृती रक्षणास मदतच होईल.

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्‍वर मंदिर, छत्रपती संभाजीनगर येथील श्री घृष्णेश्‍वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्‍वेश्‍वर मंदिर, तसेच आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे. एवढेच नसून अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळामध्ये ही वस्त्रसंहिता लागू आहे.

महाराष्ट्र शासनाने ‘शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘जीन्स पँट’, ‘टी-शर्ट’, भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र, तसेच पायात ‘स्लीपर’ वापरण्यावर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *